परळी तालुक्यात अवकाळीचा कहर; काढणीला आलेली रब्बी पिके जमीनदोस्त, झाडे,खांब उन्मळून पडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 20:33 IST2026-02-23T20:32:27+5:302026-02-23T20:33:07+5:30
धनंजय मुंडेंचे कडक आदेश! नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, जिल्हाधिकाऱ्यांना सूचना.

परळी तालुक्यात अवकाळीचा कहर; काढणीला आलेली रब्बी पिके जमीनदोस्त, झाडे,खांब उन्मळून पडले
- संजय खाकरे
परळी (बीड): परळी आणि अंबाजोगाई तालुक्यात सोमवारी दुपारी झालेल्या अवकाळी पावसाने आणि सुसाट वादळी वाऱ्याने रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान केले आहे. काढणीला आलेली ज्वारी, गहू आणि हरभरा पिके शेतातच जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान, या परिस्थितीची गंभीर दखल घेत आमदार धनंजय मुंडे यांनी प्रशासनाला तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
काढणीला आलेली पिके आडवी
सोमवारी दुपारपासून अचानक आलेल्या पावसाने आणि जोरदार वाऱ्याने तालुक्यातील अनेक गावांना तडाखा दिला. लमान तांडा, दारावती तांडा, वसंतनगर, मलकापूर, वैजवाडी, मोहद्रा आणि केशवनगर या भागात पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. खरीप हंगाम वाया गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या आशा रब्बीवर होत्या, मात्र अवकाळीने या कष्टावर पाणी फिरवले आहे.
पिंपळगाव गाढे शिवारात 'वादळा'चा तडाखा
पिंपळगाव गाढे शिवारातील कोंबडमारी परिसरात वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, अवघ्या दोन मिनिटांत अनेक झाडे मुळासकट उखडून पडली. अनेक ठिकाणी वीज खांबही जमीनदोस्त झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. सुदैवाने या नैसर्गिक आपत्तीत जीवितहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान मोठे आहे.
धनंजय मुंडे यांचे प्रशासनाला आदेश
नुकसानीची व्याप्ती पाहता माजी कृषी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परळी व अंबाजोगाई परिसरातील बाधीत शेतकऱ्यांना शासनाकडून लवकरात लवकर आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाने गतीने काम करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पवार यांनीही जिल्हाधिकाऱ्यांनी वैयक्तिक लक्ष घालून दिलासा द्यावा, अशी विनंती केली आहे.