येडशी-औरंगाबाद महामार्गावर अपघातानंतर २ तास थरार; कार पेटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 00:51 IST2019-05-12T00:50:00+5:302019-05-12T00:51:18+5:30
मुंबई येथून गोडतेल घेऊन बीडकडे येत असलेले टँकर (एम एच ४६ - ८३४१ ) आणि बीडहून तिंतरवणीकडे जात असलेल्या एका कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातानंतर कारने (क्र. एम एच २३ एव्ही ६६४९) अचानक पेट घेतला.

येडशी-औरंगाबाद महामार्गावर अपघातानंतर २ तास थरार; कार पेटली
बीड : मुंबई येथून गोडतेल घेऊन बीडकडे येत असलेले टँकर (एम एच ४६ - ८३४१ ) आणि बीडहून तिंतरवणीकडे जात असलेल्या एका कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातानंतरकारने (क्र. एम एच २३ एव्ही ६६४९) अचानक पेट घेतला. शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास येडशी-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पाडळसिंगी येथील उड्डाणपुलाजवळ सिंगल सर्व्हिस रस्त्यावर ही थरारक घटना घडली.
पेटलेले वाहन विझविण्यासाठी तात्काळ गेवराई येथील दोन, बीड येथील एक असे दोन अग्निशमन दल पाचारण केले होते. यामध्ये कार पूर्णपणे जळून खाक झाली. या अपघातात कारमधील शिरुर कासार तालुक्यातील तिंतरवणी येथील श्रीराम संस्थानचे तुकाराम महाराज रुपनर व ७ वर्षांचा मुलगा हे दोघे जखमी झाले.
टँकरने समोरुन धडक दिल्यानंतर टँकर चालक परमेश्वर जाधव याला व आजूबाजूच्या लोकांना कारने अचानक पेट घेतल्याचे दिसले. त्यामुळे टँकर मागे घेण्यात आला. परिसरातील लोकांनी धावपळ केली. गेवराई येथील नगर परिषद, कृषी उत्पन्न बाजार समितीचे व बीड येथील एक अग्निशमन दल पाचारण करण्यात आले होते. मात्र, या घटनेत कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. जखमींना तात्काळ गेवराई येथील एका रुग्णवाहिकेने गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
या अपघातामुळे काही वेळ सिंगल सर्व्हिस रस्त्यावर वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. महामार्ग वाहतूक पोलिसांनी दोन्ही वाहने बाजुला काढून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.