माजलगाव शहर पोलीस कर्मचाऱ्याने २० हजारांची लाच घेतली, पोलीस निरीक्षकांची उचलबांगडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 20:09 IST2026-01-28T20:08:43+5:302026-01-28T20:09:39+5:30
जिल्ह्यात वाळूचे टेंडर होऊन अवघे चार दिवस झाले असतानाच हप्तेखोरी सुरू झाल्याचे समोर आले.

माजलगाव शहर पोलीस कर्मचाऱ्याने २० हजारांची लाच घेतली, पोलीस निरीक्षकांची उचलबांगडी
माजलगाव: वाळूची वाहने सुरळीत चालू देण्यासाठी दरमहा २० हजार रुपयांचा हप्ता मागणाऱ्या माजलगाव शहर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी तातडीने कठोर पाऊल उचलत शहर पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी केली आहे.
जिल्ह्यात वाळूचे टेंडर होऊन अवघे चार दिवस झाले असतानाच हप्तेखोरी सुरू झाल्याचे समोर आले. माजलगाव शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी अमोल कदम याने एका तक्रारदाराकडे वाळू वाहतूक सुरळीत राहण्यासाठी दरमहा २० हजार रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम खासगी इसम तात्यासाहेब आर्डे याच्यामार्फत स्वीकारली जाणार होती. जालना एसीबीचे उपअधीक्षक बाळासाहेब जाधव यांच्या पथकाने बुधवारी माजलगाव बायपास रोडवरील लेंडाळ हॉस्पिटलसमोर सापळा रचला. यावेळी कदमच्या सांगण्यावरून आर्डे याने २० हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने दोघांनाही रंगेहाथ ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात माजलगाव शहर ठाण्यात गुन्हा दाखलची प्रक्रिया सुरू हाेती.
तडकाफडकी बदलीचे आदेश
या लाचखोरीच्या प्रकरणामुळे पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलीन झाल्याचे पाहत पोलीस अधीक्षकांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार राहुल सूर्यतळ (पोलीस निरीक्षक) यांची माजलगाव शहर ठाण्यातून तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी करण्यात आली आहे. तर उमाशंकर कस्तुरे (पोलीस निरीक्षक) यांच्याकडे माजलगाव शहर पोलीस ठाण्याचा नवीन पदभार सोपवण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षकांचा 'झिरो टॉलरन्स'
काही दिवसांपूर्वी पाटोदा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याने वाळूसाठी लाच घेतल्यावर तेथील निरीक्षकांचीही उचलबांगडी करण्यात आली होती. आता माजलगावच्या घटनेनंतर पुन्हा एकदा तशीच कारवाई झाल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. "भ्रष्टाचार करणाऱ्यांची आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांची गय केली जाणार नाही," असा स्पष्ट संदेश पोलीस अधीक्षकांनी या कारवाईतून दिला आहे.