महादेव मुंडे खून प्रकरण: पोलिसांप्रमाणेच 'SIT'चा तपासही भरकटला; ज्ञानेश्वरी मुंडेंचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 16:14 IST2026-03-13T16:13:16+5:302026-03-13T16:14:24+5:30
"माझ्या पतीला न्याय मिळणार का?"; ज्ञानेश्वरी मुंडेंची एसआयटीवर नाराजी, आता मुख्यमंत्र्यांकडे घेणार धाव!

महादेव मुंडे खून प्रकरण: पोलिसांप्रमाणेच 'SIT'चा तपासही भरकटला; ज्ञानेश्वरी मुंडेंचा गंभीर आरोप
परळी : येथील महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास भरकटल्याचा गंभीर आरोप करत, ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बुधवारी एसआयटीच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘परळी पोलिसांनी जसा तपास केला, तसाच प्रकार एसआयटीकडून सुरू आहे,’ असे म्हणत त्यांनी या तपासाच्या नि:पक्षपातीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
अंबाजोगाई येथे एसआयटी अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना ज्ञानेश्वरी मुंडे यांना अश्रू अनावर झाले होते. त्या म्हणाल्या की, ‘माझ्या पतीला न्याय मिळेल ही आशा आता मावळू लागली आहे. मुख्य संशयित ‘गोट्या गीत्ते’ जोपर्यंत सापडत नाही, तोपर्यंत या प्रकरणाचा तपास पुढे जाणार नाही. एसआयटीकडूनही तपासात टाळाटाळ केली जात असल्याचा संशय येत आहे.’ या प्रकरणाने पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडवून दिली असून, पीडित कुटुंबाला न्याय मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी वेळ द्यावा
या लढ्यासाठी आता त्यांनी मनोज जरांगे-पाटील यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. जरांगे यांच्या माध्यमातून आपण राज्याचे मुख्यमंत्र्यांची यांची भेट घेणार असून, त्यांनी आपल्याला तातडीने भेटीसाठी वेळ द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
राजेभाऊ फडांचे वक्तव्य चुकीचे
या खून प्रकरणातील संशयितांच्या नार्को टेस्टचा अहवाल अद्याप आलेला नाही. अशा स्थितीत राजेभाऊ फड यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्याबाबत केलेले वक्तव्य चुकीचे आणि संभ्रम निर्माण करणारे आहे, असेही ज्ञानेश्वरी मुंडे यांनी स्पष्ट केले.