चार महिन्यांच्या कष्टाचा आठ दिवसांत चिखल; कांद्याच्या नुकसानीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रु
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 20:22 IST2025-05-30T20:21:36+5:302025-05-30T20:22:54+5:30
अवकाळी व नंतर मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याने चार महिन्यांच्या कष्टाचा आठ दिवसांत चिखल झाला.

चार महिन्यांच्या कष्टाचा आठ दिवसांत चिखल; कांद्याच्या नुकसानीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रु
- नितीन कांबळे
कडा (जि. बीड) : कुटुंबाची आर्थिक घडी बसावी यासाठी उसनवारी आणि घरातील किडूक-मिडूक मोडून शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून कांदा लागवड केली. कांदा काढून शेतात कापणीसाठी ठेवला तर काहींनी साठवणूक केली. पण अवकाळी व नंतर मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याने चार महिन्यांच्या कष्टाचा आठ दिवसांत चिखल झाला. आष्टी तालुक्यातील साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रातील कांद्याचे नुकसान झाले आहे.
आष्टी तालुक्यातील शेतकरी नगदी पीक म्हणून कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड करतात. साडेतीन चार महिने काबाडकष्ट करून लाखो रूपयांची गुंतवणूक करतात. उन्हाळ्यात लागवड केलेल्या कांद्याला भाववाढ नसल्याने भुसारात साठवणूक करतात. तर काही शेतकरी उसनवारी घेतलेला पैसा मोकळा करण्यासाठी कांदा काढून शेतात ठेवून जागेवर भरतात. परंतु, अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रावरील कांद्याचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. हातातोंडाशी आलेल्या घासाची माती झाल्याने शेतकरी रडकुंडीला आला आहे.
आले तर लाख,नाहीतर चिखल माती अन् राख !
कांदा हे नगदी पीक आहे. कमी दिवसांत जास्त उत्पन्न मिळावे म्हणून राबायचे, पण भाव नसल्याने कांदा साठवणूक करायची, भाव भेटला तर घाईगडबडीत कांदा काढून शेतातच गोण्या भरायच्या, पण अवकाळीने गाठल्यावर हाती चिखल येतो. आले तर लाख, नाहीतर चिखलमाती अन् पदरी राख, अशी अवस्था होते.
कृषी विभागाकडून पंचनामे सुरू
तालुक्यात अवकाळी पावसाने साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रावरील कांद्याचे तसेच इतर शेतीपिकांचे नुकसान झाले असून, कृषी विभागाकडून नुकसानीचे पंचनामे करणे सुरू असल्याचे तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.