माजलगावात दोन बहिणींच्या अपहरणाचा थरार; नागरिकांनी जीव धोक्यात घालून केली सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 14:04 IST2026-02-24T14:02:55+5:302026-02-24T14:04:15+5:30
बीड हादरले! गेवराईनंतर आता माजलगावात मुलींचे अपहरण करण्याचा प्रयत्न; तिघे ताब्यात

माजलगावात दोन बहिणींच्या अपहरणाचा थरार; नागरिकांनी जीव धोक्यात घालून केली सुटका
माजलगाव : माजलगाव शहरातील आंबेडकर चौक परिसरात सोमवारी दुपारी दोन सख्ख्या बहिणींचे अपहरण करण्याचा धक्कादायक प्रयत्न झाला. मात्र, स्थानिक नागरिकांनी दाखवलेली समयसूचकता आणि तरुणांनी केलेल्या धाडसी पाठलागामुळे अपहरणकर्त्यांचा डाव फसला. पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेतले असून, शहरात या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. यापूर्वीही गेवराईत एका तरुणीचे भर दिवसा अपहरण करण्यात आले होते. वाढत्या घटनांवरून मुली असुरक्षित असल्याचे दिसत असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
अंबाजोगाई येथील रहिवासी असलेल्या दोघी बहिणी परळी तालुक्यातील पोहनेर येथून माजलगावला आल्या होत्या. बहीण ही बीड येथील महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. ती आजारी असल्यामुळे उपचारासाठी या दोन्ही बहिणी आपल्या मावसभावासोबत स्कुटीवरून माजलगाव येथील एका खासगी रुग्णालयात आल्या होत्या. दुपारी १२ च्या सुमारास दवाखान्यातून बाहेर पडल्यानंतर, बायपास परिसरात एका हुंह्याई औरा (एमएच १२ डब्ल्यूएक्स ४१६७) या चारचाकी वाहनाने त्यांना अडवले. या गाडीतील व्यक्तींनी दोन्ही बहिणींना जबरदस्तीने गाडीत ओढले आणि गाडी लॉक करून शहराच्या दिशेने वेगाने पळ काढला; परंतु नागरिकांच्या सतर्कतेमुळे एका मोठ्या अनर्थाला वेळीच रोखण्यात यश आले असून, माजलगाव शहर पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
नागरिकांची सतर्कता अन् थरारक पाठलाग
अपहरणकर्त्यांची गाडी छत्रपती शिवाजी चौक ओलांडून आंबेडकर चौकच्या दिशेने जात असताना, संभाजी चौकातील काही तरुणांना गाडीत संशयास्पद हालचाली दिसल्या. एका तरुणीला बळजबरीने नेले जात असल्याचे लक्षात येताच काही तरुणांनी दुचाकीवरून या गाडीचा थरारक पाठलाग सुरू केला. अखेर आंबेडकर चौकातील पंचवटी हॉटेलजवळ नागरिकांनी ही गाडी अडवून धरली. यावेळी परिसरात झालेल्या आरडाओरडीमुळे मोठी गर्दी जमा झाली आणि रस्ता पूर्णपणे जाम झाला.
आरोपींना घेतले ताब्यात
घटनेची माहिती मिळताच माजलगाव शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मुलींची सुटका करून गाडीतील तीन तरुणांना ताब्यात घेतले आणि पोलिस ठाण्यात नेले. याप्रकरणी भाग्यश्री हजारे यांच्या फिर्यादीवरून दिनेश पुरुषोत्तम देवकते (रा. येल्डा), मजहर सिकंदर सय्यद (रा. अंबाजोगाई), रवी बिभीषण निळे (रा. चौथाईवाडी, अंबाजोगाई) यांच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेवराईतही तरुणीचे अपहरण
काही दिवसांपूर्वी गेवराई शहरातूनही एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे भर दिवसा अपहरण करण्यात आले होते. याचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले होते. ही मुलगी नंतर परभणीत सापडली होती. ही घटना ताजी असतानाच पुन्हा माजलगावात असाच थरार पाहायला मिळाला. यावरून पोलिसांचा वचक आहे की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.