बीडच्या कपिलधारमध्ये बालविवाह; नातेवाईकच नव्हे, तर 'संस्थान'चे विश्वस्तही आरोपी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 19:46 IST2026-02-07T19:46:25+5:302026-02-07T19:46:45+5:30
बीडमध्ये इतिहासात पहिल्यांदाच ट्रस्टींवर गुन्हा दाखल

बीडच्या कपिलधारमध्ये बालविवाह; नातेवाईकच नव्हे, तर 'संस्थान'चे विश्वस्तही आरोपी
सोमनाथ खताळ
बीड : तालुक्यातील श्रद्धास्थान असलेल्या कपिलधार येथे गुरुवारी रोखण्यात आलेल्या बालविवाहाने आता मोठे वळण घेतले आहे. या प्रकरणात पोलिसांनी केवळ मुलीचे आई-वडील आणि सासरच्या मंडळींवरच नव्हे, तर कपिलधार देवस्थानच्या ट्रस्टींवर (विश्वस्तांवर)देखील गुन्हा दाखल केला आहे. बीड जिल्ह्याच्या इतिहासात बालविवाह प्रकरणात धार्मिक संस्थांच्या व्यवस्थापनाला आरोपी करण्याची ही पहिलीच वेळ असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
दहावीत ८५ टक्के गुण मिळवून विज्ञान शाखेत शिकणाऱ्या एका हुशार मुलीचा हा विवाह होता. १८ डिसेंबर २०२५ रोजी गेवराईत एका तरुणीचे भरदिवसा अपहरण झाले होते, त्या घटनेचा धसका पीडितेच्या आईने घेतला होता. आपली मुलगीही असुरक्षित आहे आणि तिला एक मुलगा त्रास देत आहे, या भीतीपोटी आईने घाईघाईत मुलीचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. मुलीचे वडील काम करीत नसल्याने कुटुंबातील असुरक्षिततेच्या भावनेने एका गुणवंत विद्यार्थिनीचे भवितव्य लग्नाच्या बेडीत अडकवण्याचा घाट घातला गेला. याची कुणकुण लागताच सामाजिक कार्यकर्ते तत्त्वशील कांबळे आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कपिलधार येथे धाड टाकली. कन्यादान सुरू असतानाच पोलिस पोहोचल्याने नवरदेव आणि वऱ्हाडी मंडळींनी मंडपातून पळ काढला. पोलिसांनी तात्काळ मुलीला ताब्यात घेऊन तिचे संरक्षण केले.
संस्थानच्या अध्यक्षांचे ‘हात वर’
या कारवाईत पोलिसांनी ‘धाडस’ दाखवत कपिलधार संस्थानच्या ट्रस्टींना आरोपी केले आहे. यापूर्वी अशा घटनांमध्ये केवळ पालकांवर कारवाई व्हायची. मात्र, यावेळी व्यवस्थापनालाही जबाबदार धरल्याने संस्थानचे धाबे दणाणले आहे. दुसरीकडे, संस्थानच्या अध्यक्षांनी ‘आम्हाला या विवाहाची माहिती नव्हती, भाविक केवळ दर्शनासाठी येतात,’ असे सांगून हात वर केले आहेत. मात्र, संस्थानच्या आवारात इतका मोठा सोहळा सुरू असताना व्यवस्थापन गाफील कसे, असा प्रश्न पोलिसांनी उपस्थित केला आहे.
२१ पैकी १४ विश्वस्त हयात; सर्वांची होणार चौकशी!
कपिलधार येथील श्री संत मन्मथस्वामी समाधीस्थळी महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून येणाऱ्या भाविकांच्या निवासाची व सोहळ्यांची व्यवस्था संस्थानमार्फत केली जाते. याच ठिकाणी गुरुवारी बालविवाह पार पडला. संस्थानचे अध्यक्ष विश्वस्त म्हणून हात वर करीत असले, तरी पोलिसांकडे याचे ठोस पुरावे असल्याने ट्रस्टींना आरोपी करण्यात आले आहे. संस्थानचे अध्यक्ष सोमनाथ हालगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण २१ विश्वस्तांपैकी १४ विश्वस्त सध्या हयात आहेत. या सर्व हयात विश्वस्तांचे जबाब पोलिस नोंदवून घेणार असून, या कारवाईमुळे संस्थानच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
जबाब देऊ
लोक येतात आणि लग्न लावून जातात. कालच्या लग्नाची कसलीही नोंद नाही किंवा परवानगी घेतलेली नाही. भाविक येत असतात आणि प्रसाद घेऊन जातात. असा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. आम्ही जबाब देणार आहोत.
- सोमनाथ हालगे, अध्यक्ष, कपिलधार संस्थान