'आज पुन्हा पोरका झालो!' अजितदादांच्या निधनाने धनंजय मुंडेंना अश्रू अनावर; वडिलांसमान सावली हरपल्याची हळहळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 12:32 IST2026-01-28T12:30:14+5:302026-01-28T12:32:54+5:30
Ajit Pawar Death: "धनंजय वेळेवर ये बरं का..." आता हा शब्द पुन्हा ऐकायला मिळणार नाही; मुंडेंनी व्यक्त केल्या भावना

'आज पुन्हा पोरका झालो!' अजितदादांच्या निधनाने धनंजय मुंडेंना अश्रू अनावर; वडिलांसमान सावली हरपल्याची हळहळ
परळी: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच त्यांचे खंदे समर्थक आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे यांना प्रचंड धक्का बसला आहे. "आज मी पुन्हा पोरका झालो," अशा शब्दांत मुंडेंनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली असून, ते तातडीने परळीहून बारामतीकडे रवाना झाले आहेत.
वडील गेल्यानंतरचा आधार हरपला
अजित पवार आणि धनंजय मुंडे यांचे नाते केवळ राजकीय नव्हते. वडील पंडितअण्णा मुंडे यांच्या निधनानंतर अजितदादांनी वडिलांप्रमाणे आधार दिला होता, अशा भावना धनंजय मुंडेंनी व्यक्त केल्या. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये मुंडे म्हणतात, "माझे वडील गेल्यानंतर दादांनी मला वडील नसल्याचे कधी जाणवू दिले नाही. आमचे राजकीय अस्तित्व त्यांच्याच जीवावर होते. आजही असे वाटते की, आत्ता दादांचा फोन येईल आणि म्हणतील, 'धनंजय वेळेवर ये बरं का!'"
विकासाचा बुलंद आवाज शांत
महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न उराशी घेऊन भल्या पहाटे कामाला लागणारा नेता आज महाराष्ट्राला स्तब्ध करून निघून गेला, अशा शब्दांत मुंडेंनी दादांच्या कार्यपद्धतीचा गौरव केला. "वेळेचे नियोजन आणि शिस्त यातून विकासाचा दरारा उभा करणारे दादा आम्हा सर्वांना दुःखाच्या छायेत सोडून गेले आहेत," असेही त्यांनी नमूद केले. धनंजय मुंडे यांच्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. बीड जिल्हा आणि राज्यासाठी ही कधीही न भरून निघणारी हानी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.