नियतीचा क्रूर खेळ! गोपीनाथ मुंडे, विनायक मेटेंनंतर अजितदादांच्या रुपाने बीड पोरकं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 14:25 IST2026-01-29T14:24:20+5:302026-01-29T14:25:01+5:30
Ajit Pawar Death: बीड जिल्ह्याने यापूर्वी दोनदा असाच भीषण आघात सोसला आहे.

नियतीचा क्रूर खेळ! गोपीनाथ मुंडे, विनायक मेटेंनंतर अजितदादांच्या रुपाने बीड पोरकं
बीड : महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘दादा माणूस’ आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण राज्य हादरून गेले आहे. बीड जिल्ह्यासाठी हा प्रसंग केवळ एक राजकीय हानी नसून, नियतीने पुन्हा एकदा केलेली क्रूर थट्टा ठरली आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे, विनायक मेटे आणि आता अजित पवार या तीनही मोठ्या नेत्यांचा प्रवास अपघातानेच संपल्याने बीड जिल्हा पोरका झाला आहे.
बीड जिल्ह्याने यापूर्वी दोनदा असाच भीषण आघात सोसला आहे. ३ जून २०१४ रोजी, केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर भाजपचे गोपीनाथराव मुंडे पहिल्यांदाच जिल्ह्याकडे येत होते. अख्खा जिल्हा स्वागतासाठी सजला असताना, दिल्लीत त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि जिल्ह्यावर शोककळा पसरली. त्यानंतर १४ ऑगस्ट २०२२ रोजी, मराठा आरक्षणाच्या लढ्यातील बुलंद आवाज शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झाला. मेटे देखील समाजाच्या हक्कासाठी मुंबईकडे धाव घेत होते.
बीडशी जडलेले दादांचे नाते
अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री असले तरी, बीडचे पालकमंत्री म्हणून त्यांनी अल्पावधीतच जिल्ह्याशी घट्ट नाते निर्माण केले होते. प्रशासकीय शिस्त आणि विकासाचा धडाका यामुळे बीडचा कायापालट होईल, अशी मोठी आशा जनतेला होती. ‘बीडची बारामती करू,’ हा त्यांचा शब्द जिल्ह्यासाठी नवा आत्मविश्वास देणारा ठरला होता. मात्र, गोपीनाथ मुंडे आणि विनायक मेटेंप्रमाणेच अजितदादांचा प्रवासही नियतीने अपघाताच्या वळणावर थांबवला.
पहाटेच येतात अपघाताच्या बातम्या
बुधवारी सकाळी डोळे उघडताच मोबाइलवर धडकलेल्या अजित पवारांच्या विमान अपघाताच्या बातमीने बीड जिल्हा हादरला. यापूर्वी गोपीनाथ मुंडे आणि विनायक मेटे यांच्या निधनाची वार्ताही अशीच पहाटे आली होती. सुरुवातीला कुणाचाच विश्वास बसला नाही. मात्र, फोनाफोनी करून खात्री पटताच जिल्ह्यावर शोककळा पसरली. नियतीच्या क्रूर खेळामुळे बीडने पुन्हा एकदा आपला हक्काचा ‘पालक’ गमावला आहे.