मराठवाड्याला १३९ मि.मी.अतिरिक्त पावसाचा तडाखा; १५ लाख हेक्टरवरील पिके चिखलात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 15:03 IST2021-09-16T14:54:54+5:302021-09-16T15:03:39+5:30
Heavy Rain Hits Marathwada : अनेक ठिकाणची पिके पाण्याखाली असल्यामुळे नुकसानीचा अंदाज बांधणे सध्या अवघड

मराठवाड्याला १३९ मि.मी.अतिरिक्त पावसाचा तडाखा; १५ लाख हेक्टरवरील पिके चिखलात
औरंगाबाद : मराठवाड्यातील सुमारे १५ लाख हेक्टरवरील पिकांचा अतिवृष्टीमुळे ( Heavy Rain Hits Marathwada ) चिखल झाला आहे. प्राथमिक पाहणीच्या अंदाजानुसार ही आकडेवारी समोर आली असून, आठ दिवसांनंतर किती क्षेत्रफळाचे नुकसान झाले हे समोर येईल, अशी माहिती विभागीय आयुक्तालयातील सूत्रांनी दिली. नुकसान झालेल्या पिकांमध्ये कापूस, मका, सोयाबीनसह कडधान्य प्रकारातील पिकांचा समावेश आहे.
प्राथमिक पाहणीनुसार औरंगाबाद जिल्ह्यात एक लाख ७२ हजार १५ हेक्टर, जालना जिल्ह्यात दोन लाख २४ हजार ६६६, परभणी एक लाख ६१ हजार २७, हिंंगोली जिल्ह्यात आठ हजार ९१९, तर नांदेड जिल्ह्यात तीन लाख ७१ हजार ८५४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. बीड जिल्ह्यातील पाच लाख १९ हजार ४२५ हेक्टर, लातूर सहा हजार २२, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील दहा हजार ४८६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. १४ लाख ७४ हजार ८१५ हेक्टरवरील पिके अतिवृष्टीमुळे वाया गेल्याचे यातून दिसते आहे. आयुक्तालय सूत्रांनी सांगितले, २० टक्क्यांच्या आसपास पंचनामे झाले आहेत. आठ दिवसांत पंचनामे पूर्ण होणे शक्य आहे. सध्या नजर अंदाजानुसार पंचनामे होत आहेत. अनेक ठिकाणची पिके पाण्याखाली असल्यामुळे नुकसानीचा अंदाज बांधणे सध्या अवघड आहे. त्यामुळे प्राथमिक आकडेवारीत कमी-अधिक प्रमाणात बदल होऊ शकतो.
हेही वाचा - मराठवाड्याला ‘अर्थ’ संजीवनी; राष्ट्रीयीकृत बँकांच्या परिषदेला औरंगाबादेत सुरुवात
मराठवाडा @ ८१८.८ मिलीमीटर; १३९ मि.मी.अतिरिक्त पाऊस
मराठवाड्यात वार्षिक सरासरीच्या ६७९.५ मिलीमीटर तुलनेत १५ सप्टेंबरपर्यंत ८१८.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सरासरीपेक्षा १३९.३ मि.मी. पाऊस जास्त झाला आहे. यामुळे विभागातील खरीप हंंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. लातूर आणि उस्मानाबादवगळता सर्व जिल्ह्यांत सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस झाला आहे. सर्व जिल्ह्यांची वार्षिक सरासरी पूर्ण झाल्याचे पावसाच्या नोंदीवरून दिसते आहे. तीन दिवसांपासून विभागात पावसाने उघडीप दिली आहे.
विभागात जिल्हानिहाय झालेला पाऊस असा
जिल्हा-----वार्षिक सरासरी-----झालेला पाऊस-----टक्केवारी
औरंगाबाद --५८१.७ मि.मी.-----७१९.८ मि.मी.------१२३.७४ टक्के
जालना---- ६०३.१ मि.मी.------८६४.३ मि.मी.------१४३.४१ टक्के
बीड-----५६६.१ मि.मी.------७७१.५ मि.मी.-------१३६.२८ टक्के
लातूर----७०६.०० मि.मी.-----७२७.०० मि.मी.------१०२.९७ टक्के
उस्मानाबाद--६०३.१ मि.मी.----६३९.९ मि.मी.-------१०५.६० टक्के
नांदेड-----८१४.४ मि.मी-----९९१.३ मि.मी.-------१२१.७२ टक्के
परभणी----७६१.३ मि.मी.----९०३.४ मि.मी.-------११८.६७ टक्के
हिंगोली ---७९५.३ मि.मी.-----८८४.८ मि.मी.------१११.२५ टक्के
एकूण----६७९.५ मि.मी. -----८१८.८ मि.मी.------१२०.५० टक्के
हेही वाचा - 'जनधन- आधार- मोबाईल' लिंकिंग गेम चेंजर : निर्मला सीतारमण