लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : ज्या वयात अक्षरे गिरवावी, बालपण आनंदात जगावे, नेमके त्याच वयात आदिवासी मुलांच्या नशिबी आलेले चित्र विदारक आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी मेळघाटातून स्थलांतरित आदिवासी कुटुंब अमरावती शहरासह लगतच्या वीटभट्ट्यांवर कष्ट करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या सोबत असलेली चिमुकली मुले मात्र त्यांच्या मूलभूत शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे त्यांच्या उद्ध्वस्त भविष्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शहरालगत असलेल्या अंजनगाव बारी, कोडेश्वर येथे जवळपास १५० वीटभट्या आहेत. याठिकाणी काम करणारा मजूर वर्ग हा सर्वाधिक मेळघाटातील आदिवासी बांधव आहे. मेळघाटात रोजगार मिळत नसल्याने पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी शेकडो आदिवासी मजुरांचे हात हे वीट बनवण्यात व्यस्त आहेत. परंतु, या स्थलांतरणामुळे त्यांची चिमुकली मुले आपल्या मूलभूत शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित राहत आहेत.
प्रशासनाने सुरू केलेली वीटभट्टीवरील शाळाही बंद असल्याची प्राथमिक माहिती आहे. या वीटभट्टी परिसरात काही स्तनदा माता, तर काही गर्भवती मातादेखील आहेत. त्यांच्याही आरोग्याचा प्रश्न यामुळे निर्माण होत आहे. तेथे १ ते ६ वर्षांची मुले ही मातीमध्ये खेळताना, तर थोडी मोठी मुले कामात मदत करताना दिसून येतात. बंद शाळेविषयी प्राथमिक शिक्षणाधिकारी माहिती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अंजनगाव पीएचसीमध्ये तीन महिलांची प्रसूती अंजनगाव बारी पीएचसीने केलेल्या सर्वेक्षणानुसार याठिकाणी १२ स्तनदा माता, तर ६ गर्भवती माता आहेत. ० ते २ वर्षे वयोगटातील ३० बालके, २ ते ६ वर्षे वयोगटातील ७० बालके याठिकाणी आहेत. तीन महिलांची प्रसूतीदेखील आरोग्य केंद्रात आणून करण्यात आली.
पोषण आहारासाठी केली मागणी सर्वेनुसार याठिकाणी ० ते ३ वर्षे वयोची ९० तर ३ ते ६ वर्षांची १८५ बालके आहेत. त्याचबरोबर १६ गरोदर आणि १४ स्तनदा माता आहेत. यासाठी पोषण किट्स मागणी करण्यात आली आहे.