लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : देशभरासाठी जिल्ह्यातून एकंदरीत ३२ रेल्वे गाड्या धावत असताना मध्यंतरी ‘लॉकडाऊन’चा फटका बसला आणि प्रवाशांअभावी बहुंताश रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या. मात्र, पश्चिम विदर्भातील रेल्वे प्रवाशांच्या पसंतीला उतरलेली अमरावती-मुंबई एक्स्प्रेस काही काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आली. त्यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी ओसरली. परिणामी प्रवासीसंख्या नसलेल्या अमरावती-पुणे, अमरावती- मुंबई एक्स्प्रेस, अमरावती-जबलपूर या रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या. मात्र, आता रेल्वे गाड्या पूर्ववत सुरू व्हाव्यात, अशी मागणी पुढे येत आहे.
एसीचेही वेटिंग!मुंबई, हावडा, अहमदाबाद मार्गावरील प्रमुख रेल्वे गाड्यांमध्ये वातानुलित डब्यांमध्येही आरक्षण वेटिंगवर आहे. पुढील दीड महिने रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण मिळत नसल्याने अनलॉकनंतरही प्रवास कसा करावा, हा गंभीर प्रश्न आहे.
दिल्ली मार्गावर प्रवासी मिळेनातबडनेरा रेल्वे स्थानकाहून दिल्लीमार्गे जाणारी भुसावळ- गोंडवाना एक्स्प्रेस अगोदरच बंद करण्यात आली. मात्र, दिल्लीकडे ये-जा करणाऱ्या प्रवाशांची आरक्षण मिळविण्यासाठी फारच कमी संख्या आहे. नागपूर, वर्धा रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या गाड्यांमध्येही हीच स्थिती आहे.
सर्वाधिक वेटिंग ‘विदर्भ’ला विदर्भातील प्रवाशांना मुंबईकडे ये-जा करण्यासाठी हक्काची रेल्वे ही गोंदिया - मुंबई विदर्भ एक्स्प्रेस आहे. मात्र, अमरावती - मुंबई एक्स्प्रेस बंद असल्याने प्रवाशांची विदर्भ एक्स्प्रेसला पसंती आहे. रेल्वे गाड्यांची संख्या कमी झाल्यामुळे विदर्भ एक्सप्रेसवरच ताण आला आहे. १५ जुलैपर्यंत विदर्भ एक्सप्रेसमध्ये ‘नो रूम’ आहे.