अमरावतीतील गावात सायंकाळी भोंगा वाजला की बंद होतात मोबाइल, टीव्ही; राज्यभर 'या' गावाची का आहे चर्चा ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 17:07 IST2026-01-09T17:06:02+5:302026-01-09T17:07:26+5:30
Amravati : गावातील मुलं शिकली पाहिजे, या उद्दात्त हेतूने सरपंचाच्या संकल्पनेतून तालुक्यातील पिंपळखुटा गावाने शिक्षणाच्या क्षेत्रात एक प्रेरणादायी पाऊल उचलले आहे.

In a village in Amravati, when the evening bell rings, mobile phones and TVs are switched off; Why is this village being talked about across the state?
लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड : गावातील मुलं शिकली पाहिजे, या उद्दात्त हेतूने सरपंचाच्या संकल्पनेतून तालुक्यातील पिंपळखुटा गावाने शिक्षणाच्या क्षेत्रात एक प्रेरणादायी पाऊल उचलले आहे. सायंकाळी ७ वाजता सायरनचा भोंगा वाजवून मोबाइल, टीव्ही बंद करून अभ्यासाला लागण्याची सूचना ग्रामस्थांना दिली जाते.
मोबाइल, टीव्हीच्या नादात भरकटलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची दिशा देण्यासाठी पिंपळखुटा ग्रामवासीयांनी दररोज सायंकाळी ७ वाजता मोबाइल आणि टीव्ही बंद करून सर्व मुलांना अभ्यासाला बसवण्याचा सामूहिक निर्णय घेतला आहे. हा उपक्रम रात्री नऊ वाजेपर्यंत केवळ दोन तास राबविला जातो. 'अभ्यासाचा भोंगा' उपक्रमामुळे गावातील मुला-मुलींमध्ये शिस्त, एकाग्रता व अभ्यासाची ओढ निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले.
ग्रामपंचायतीचा पुढाकार
गावचे सरपंच गजानन पडोळे, उपसरपंच, सदस्य तसेच शिक्षक यांच्या नेतृत्वाखाली या प्रेरणादायी उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. याद्वारे पिंपळखुटा गाव अमरावती जिल्ह्यासाठी आदर्श ठरत आहेत.
गटविकास अधिकाऱ्यांनी केली खातरजमा
'अभ्यासाचा भोंगा' उपक्रमाची दखल गटविकास अधिकारी सुभाष पिल्लारे, विस्तार अधिकारी नितीन सुपलेसह पंचायत समिती शिक्षण विभागाच्या पथकाने या उपक्रमाची तपासणी केली. रात्री नियोजित दोन तासात घराघरांत मुलं-मुली अभ्यासात व्यस्त दिसले.
"पिंपळखुटा गावात रात्री ७ ते ९ या दोन तासात विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा, उच्च विद्याविभूषित व्हावे, या उद्देशाने गावातील विद्युत खांबावर भोंगा लावून त्यामध्ये सायरन वाजवून ग्रामपंचायतीमधून सूचना दिल्या जाते. वेळीच सर्व ग्रामस्थ मोबाइल, टीव्ही बंद करून मुलांना अभ्यासाला बसवितात. हा उपक्रम कौतुकास्पद आहे."
- सुभाष पिल्लारे, गटविकास अधिकारी
"मोबाइल, टीव्हीला बाजूला ठेवून ज्ञानाला प्राधान्य देणारा हा उपक्रम गावातील मुलांच्या उज्ज्वल भवितव्याचा पाया मजबूत होत आहे."
- गजानन पडोळे, सरपंच