मेळघाटच्या जंगलात वणवा पेटला; वृक्ष, वन्यजीव आले संकटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 19:20 IST2026-03-09T19:20:09+5:302026-03-09T19:20:56+5:30
Amravati : मेळघाटात उन्हाची तीव्रता वाढताच जंगलात वणवा पेटण्याच्या घटनांना सुरुवात झाली. अकोट वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या धारगड वनपरिक्षेत्रातील जंगल परिसरात भीषण आग लागल्याचे समोर आले.

Fire breaks out in Melghat forest; Trees, wildlife in danger
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : मेळघाटात उन्हाची तीव्रता वाढताच जंगलात वणवा पेटण्याच्या घटनांना सुरुवात झाली. अकोट वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या धारगड वनपरिक्षेत्रातील जंगल परिसरात भीषण आग लागल्याचे समोर आले. यामध्ये मोठ्या प्रमाणात वनसंपदा जळून खाक झाली आहे. या आगीमुळेमेळघाटातील जैवविविधता धोक्यात आली असून वन्यप्राण्यांच्या जिवालाही मोठा धोका निर्माण झाला आहे.
दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांत मेळघाट व्याघ्र प्रकल्प, प्रादेशिक विभाग आणि अकोट वन्यजीव विभागात वणवा लागण्याचे प्रमाण वाढते. धारणी-अकोट मार्गावरील हायपॉइंटनजीक रात्रीच्या सुमारास लागलेल्या आगीमुळे गवत, झुडपे व लहान वनस्पतींचे प्रचंड नुकसान झाले. विशेष म्हणजे, आगीच्या धुरामुळे वन्यप्राणी सुरक्षेसाठी मानवी वस्त्यांकडे किंवा इतर भागांत स्थलांतर करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आगीचे सत्र सुरूच
वणवा रोखण्यासाठी दरवर्षी जाळरेषा कापण्यासह 'अंगारी' योजनेंतर्गत लाखोंचा खर्च केला जातो. यातून फायर लाईन, गस्त वाढवणे आणि जनजागृतीसारखी कामे केली जातात. मेळघाटात वारंवार लागणाऱ्या आर्गीमुळे या उपाययोजना आणि खर्चावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
नागरिकांना खबरदारीचे आवाहन
धारगडमधील आग विझवण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. दरम्यान, उन्हाळ्याच्या दिवसांत नागरिकांनी किंवा प्रवाशांनी जंगल परिसरात जाताना निष्काळजीपणा टाळावा. पेटती विडी, सिगारेट किंवा कोणत्याही ज्वलनशील वस्तू जंगलात फेकू नयेत, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.