आचारसंहिता संपली, तरीही विकासकामे लटकली!

By Admin | Updated: October 25, 2014 01:13 IST2014-10-25T00:51:02+5:302014-10-25T01:13:16+5:30

अकोलेकरांच्या अपेक्षेवर पाणी; प्रशासन कोणतीही हालचाल करीत नसल्याचे चित्र.

Code of Conduct ended, still development works! | आचारसंहिता संपली, तरीही विकासकामे लटकली!

आचारसंहिता संपली, तरीही विकासकामे लटकली!

अकोला: आचारसंहिता संपल्यानंतर विकास कामांना सुरुवात होईल, या अकोलेकरांच्या अपेक्षेवर पाणी फेरल्या गेले आहे. शहरात मूलभूत सुविधा व विकास कामांसाठी प्राप्त २६ कोटी व रस्ते दुरुस्तीसाठी प्राप्त १५ कोटींच्या अनुदानातील विकास कामांसंदर्भात प्रशासन कोणतीही हालचाल करीत नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे कंत्राटदारांची देयके थकीत ठेवल्याने कंत्राटदारांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे.
मनपा निवडणुकीच्या कालावधीत शहराची बकाल अवस्था लक्षात घेता, शासनाने मूलभूत सुविधा व विकास कामांसाठी २६ कोटींचे अनुदान वितरित केले. हा निधी मार्च २0१३ मध्ये मनपाला प्राप्त झाला. मनपाच्या महासभेत २६ कोटींपैकी ११ कोटी ८५ लाख रुपये पाणीपुरवठा योजना हस्तांतरणासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. अर्थातच, १४ कोटींच्या विकास कामांचे प्रस्ताव तयार केल्यानंतर प्रशासनाने हा प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांकडे पाठवला.
१२ सप्टेंबर रोजी विभागीय आयुक्तांनी प्रस्तावाला मंजुरी दिली असली तरी नेमकी त्याच दिवशी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. यामुळे प्रशासनाला विकास कामांच्या निविदा काढणे शक्य नव्हते.
याप्रमाणेच केवळ रस्ते दुरुस्तीसाठी शासनाने १५ कोटींचे अनुदान वितरित केले. या अनुदानातून डांबरीकरणाचे १२ व सिमेंटचे ६ असे एकूण १८ रस्त्यांच्या निविदा प्रकाशित करण्यात आल्या. सिमेंट काँक्रीटचे सहा रस्ते वगळल्यास इतर रस्त्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
आचारसंहिता संपल्यानंतर २१ ऑक्टोबरपासून विकास कामांना सुरुवात होईल, मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी १८ ऑक्टोबर रोजी स्पष्ट केले होते.

Web Title: Code of Conduct ended, still development works!