"पोरांनो दंगलीच्या भानगडीत पडू नका, तुमचा वापर फक्त...", इंदुरीकर महाराजांचे कीर्तन पुन्हा चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 17:44 IST2026-02-02T17:42:47+5:302026-02-02T17:44:06+5:30
Indurikar Maharaj News: निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. तरुणांनी दंगलीपासून दूर राहण्याचे आवाहन करतानाच त्यांनी राज्यातील सर्व शाळांमध्ये मोबाईल बंदी केली गेली पाहिजे, अशी मागणीही केली आहे.

"पोरांनो दंगलीच्या भानगडीत पडू नका, तुमचा वापर फक्त...", इंदुरीकर महाराजांचे कीर्तन पुन्हा चर्चेत
"पोरांनो, मोर्चे आणि दंगलीच्या भानगडींमध्ये पडू नका. तुमचा वापर फक्त यूज अँड थ्रो साठी (वापरा आणि फेकून द्या) होतो आहे. आज प्रत्येक कामामध्ये पोलीस पडताळणी आवश्यक झालेली आहे. अशा दंगलीमध्ये तुम्ही दिसलात तर १० वर्षांची शिक्षा आहे", असे आवाहन करत निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी शाळांमध्ये मोबाईल बंदी करण्यात यावी, अशी मागणी केली.
दीड वर्षे शेती करून पाहिली, पण...
इंदुरीकर महाराज कीर्तनात म्हणाले, "दहावी आणि बारावीच्या परीक्षा तोंडावर आल्या आहेत. मुले काहीच अभ्यास करत नाहीत. राज्यातील सर्व शाळांमध्ये परीक्षा काळात मोबाईलवर बंदी घातली पाहिजे. मी दीड वर्षे शेती करून पाहिली, काहीही खरं नाही. इतर काहीही खरा, पण भाजी आणि किराणा वरच्यावर भरता येईल असे काहीतरी करा", असा सल्ला इंदुरीकर महाराजांनी दिला.
रम्मी खेळून पोरं भिकारी झाली
तरुण पिढीमध्ये वाढलेल्या जुगाराच्या व्यसनाबद्दलही इंदुरीकर महाराजांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, "आजकाल शाळेतील पोरं रम्मी खेळून भिकारी झाली आहेत. पोरं अभ्यास करणारे नाहीत. अभ्यास हा विषय त्यांनी सोडून दिला आहे. परीक्षा आली की खिडकीतून चिठ्ठ्या येतात", असे म्हणत त्यांनी परीक्षा काळात होणाऱ्या कॉपीच्या प्रकारावरही टीका केली.
मुली दरिद्री मुलांसोबत जातात
"मुलगी हुशार मुलावर कधीही प्रेम करत नाही. ती कधीही चांगल्या मुलाच्या नादी लागत नाही. मुली दरिद्री मुलाच्याच नादी लागतात. त्याच्यावर प्रेम करतात. विहिरीवरील मोटारी चोरणारे, गाड्यांचे पार्ट चोरणाऱ्या मुलांच्या नादाला मुली लागतात. दरिद्री मुलासोबत पळून गेलेली मुलगी आयुष्यात कधीही सुखी होत नाही. तिने सुखी असल्याचे सांगावे मी तिच्या घरी सहा महिने भांडे घासतो", असेही इंदुरीकर महाराज म्हणाले.
लोक मला शिव्या देतात
इंदुरीकर महाराज मागे झालेल्या टीकेच्या मुद्दावर बोलताना म्हणाले, "मी काहीही केलं तर लोक मला शिव्या देतात. मी फक्त सत्य बोलतो तरी लोक माझ्यावर टीका करतात. ३१ वर्षे आयुष्य लोकांच्या शिव्या खाण्यात गेले आहे. मग थोड्यासाठी कशाला बंद करायचे. यापुढेही आपण कीर्तन सुरू ठेवणार आहे, ", असे उत्तर इंदुरीकर महाराजांनी टीकाकारांना दिले.
तुम्हाला वापरून फेकून देतील
इंदुरीकर महाराजांनी तरुणांना गुन्हेगारीपासून दूर राहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, "आजकाल पेनमध्ये कॅमेरे आहेत. टपरी पेटवताना किंवा दंगलीत तुम्ही कुठे दिसले, तर १० वर्षांची शिक्षा आहे. आतापर्यंत दंगलींमध्ये गरिबांची पोरं आत गेली आहेत. मोठ्या श्रीमंतांची पोरं नाहीत आणि ते कधी जाऊ देणारही नाहीत. ते तुम्हाला वापरून फेकून देतील."