राजूर (जि. अहमदनगर) : उत्तर नगर जिल्हाची भाग्यरेखा ठरलेले भंडारदरा धरण आज सकाळी अकरा वाजता पूर्णक्षमतेने भरले. धरणात होत असलेल्या नवीन पाण्याची आवक लक्षात घेता या धरणातील पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी धरणाचे दोन्ही लोखंडी वक्र दरवाजे एक फुटाने उचलत स्पिलवे गेटमधून २ हजार ४३६ कुसेकने तर वीज निर्मिती साठी ८२९ कुसेक असे एकूण ३ हजार २५६ कुसेक्सने धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली. धरणात होत असलेल्या नवीन पाण्याची आवक लक्षात घेत धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यात वाढ करण्यात येईल असे अकोले भंडारदरा जलसंपदा विभागाचे उपअभियंता अभिजित देशमुख यांनी "लोकमत"शी बोलताना सांगितले.
भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात या वर्षी मान्सूनचे वेळेत आगमन झाले होते. या वेळी धरणात पाणी साठाही शिल्लक होता त्यामुळे या वर्षी धरण लवकरच भरणार असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र मध्यंतरी पावसाने ओढ दिली आणि १५ ऑगस्ट पूर्वी भंडारदरा धरण भरण्याच्या आशा फोल ठरल्या. मात्र मागील चार दिवसांपासून या परिसरात पावसाने चांगला जोर धरला आणि धरण भरण्याच्या आशा पल्लवित झाल्या. अखेर आज रविवारी सकाळी अकरा वाजता भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरले म्हणजेच धरणातील पाणी साठा ११ हजार ३९ दशलक्ष घनफुट झाला आणि पाटबंधारे विभागाने धरण भरल्याचे जाहीर करत धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात केली.