आयटीआय प्रवेशासाठी १५ जुलैपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, आतापर्यंत नगर जिल्ह्यात खासगी व शासकीय आयटीआयमधील एकूण ७ हजार २० जागांसाठी ७ हजार ४७ अर्ज प्राप्त झाले आहेत. ही संख्या मागील वर्षीच्या तुलनेत साडेपाच हजाराने कमी आहे. अर्ज करण्याची मुदत ३१ ॲागस्टपर्यंत आहे. तोपर्यंत आणखी अर्ज वाढतील. यात उपलब्ध जागांपैकी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असली तरी नंतर प्रवेशावेळी ही संख्या आणखी कमी होते. कारण मागील वर्षी प्रत्यक्षात १२ हजार ७०० अर्ज आले असले तरी प्रवेश केवळ ४ हजार २८६ एवढेच झाले होते.
त्यामुळे अर्ज संख्या आणखी वाढविण्यासाठी आयटीआय संचालनालयाकडून ‘प्रवेश प्रोत्साहन अभियान’ राबविण्यात येत आहे. यानुसार गावोगावी किंवा शाळेत जाऊन पालक, विद्यार्थ्यांना आयटीआयचे महत्त्व पटवून दिले जात आहे.
--------------
जिल्ह्यातील शासकीय आयटीआय - १६
एकूण प्रवेश क्षमता - २८८८
खासगी आयटीआय - २८
एकूण प्रवेश क्षमता - ४१३२
आतापर्यंत आलेले अर्ज - ७०४७
-----------------
का मिळतो कमी प्रतिसाद
- दहावीचा निकाल जास्त लागल्याने विज्ञान, वाणिज्य शाखेकडे किंवा इतर अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे.
- आयटीआय प्रवेशासाठी सर्वच विद्यार्थ्यांकडून फिटर, टर्नर ट्रेडला सर्वाधिक पसंती दिली जाते. परंतु, या ट्रेडला मर्यादित जागा असल्याने प्रवेश मिळत नाही.
--------------
आयटीआयला अर्ज भरला आहे. त्याचवेळी अकरावी विज्ञानसाठीही अर्ज भरला आहे. यात चांगले काॅलेज मिळाले नाही तर आयटीआयलाच प्रवेश घेणार आहे.
- संकेत कोळगे, विद्यार्थी
-----------
आयटीआयच्या इलेक्ट्रिशिएन, फिटरसाठी अर्ज केला आहे. तो ट्रेड मिळाला तरच प्रवेश ठेवेन, अन्यथा अकरावीसाठी प्रवेश घेणार आहे.
- प्रीती जाधव, विद्यार्थिनी
-----------
नगर जिल्ह्यात शासकीय व खासगी आयटीआयच्या एकूण ७ हजार जागा आहेत. आतापर्यंत ७ हजार ४७ अर्ज आले आहेत. अजून अर्ज येण्यासाठी ‘प्रवेश प्रोत्साहन अभियाना’नुसार प्रयत्न सुरू आहेत.
- सुनील शिंदे, प्राचार्य, आयटीआय काॅलेज