लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : पारनेर आणि संगमनेर तालुके अजूनही हॉटस्पॉट आहेत. या दोन्ही तालुक्यांत दैनंदिन रुग्णसंख्या शंभरवर आहे. चार ते पाच हजार जणांवर उपचार सुरू आहेत. राज्यात सर्वाधिक रुग्णसंख्या अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातच आढळून येत आहे. असे असले तरी जिल्ह्यातील ७२३ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. नियमांचे काटेकोर पालन केल्याने या गावांमध्ये कोरोना हद्दपार झाला आहे.
जिल्ह्यात एकूण १३१८ ग्रामपंचायती आहेत, तर १५९६ गावांची संख्या आहे. १३१८ ग्रामपंचायतींपैकी ५६९ ग्रामपंचायतींच्या हद्दीत कोरोना संपुष्टात आला आहे. गावांच्या संख्येचा विचार केला तर १५९६ गावांपैकी ७२३ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. हे प्रमाण ४५ टक्के आहे. सध्या पारनेर आणि संगमनेर ही दोन तालुके हॉटस्पॉट आहेत. या दोन्ही तालुक्यांत प्रत्येकी १२५ ते १५० रुग्ण रोज आढळून येत आहेत. या दोन तालुक्यांत चाचण्यांचा वेग वाढविण्यात आला आहे. एका तालुक्यात रोज पाचशे ते सातशे चाचण्या होत आहेत. या तालुक्यांमध्येही ५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आहे. याशिवाय शेवगाव, श्रीगोंदा या तालुक्यांमध्येही अधूनमधून रुग्णसंख्या वाढते.
-------------------
जिल्ह्यातील कोरोनामुक्त गावांची संख्या
अकोले- १३७
संगमनेर-८१
कोपरगाव-४३
राहाता-२६
श्रीरामपूर-२७
राहुरी-४०
नेवासा-३२
शेवगाव-२८
पाथर्डी-४९
जामखेड-४२
कर्जत-७१
श्रीगोंदा-५३
पारनेर-३३
नगर-६१
एकूण-७२३
-------------
सावधान... या गावांत पॉझिटिव्ह आढळतात
संगमनेर, पारनेर, शेवगाव, अकोले, कर्जत, नगर ग्रामीण, पारनेर, पाथर्डी या तालुक्यांत रुग्णसंख्या आढळून येत आहे. दैनंदिन रुग्णसंख्या सरासरी सातशे ते आठशे आहे. बाधित असलेल्या गावांमध्ये सर्वाधिक गावे पारनेर आणि संगमनेर या दोनच तालुक्यांत आहेत.
--------------
दररोज १५ हजार चाचण्या
सध्या जिल्हाभरात दररोज १५,००० कोरोना चाचण्या केल्या जातात. ही संख्या वाढविण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने सांगितले. १५ हजार चाचण्यांपैकी ७०० ते ८०० कोरोना पॉझिटिव्ह होत असल्याने बाधित होण्याचे प्रमाण ५ टक्के असल्याचे दिसते.
------------
डमी क्रमांक-१०४९