पावसाने पिकांना दिलासा... बळीराजाला आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:25 IST2021-08-19T04:25:50+5:302021-08-19T04:25:50+5:30
घारगाव, बोटा, नांदूर खंदरमाळ, माळेगाव पठार, अकलापूर, भोजदरी, पोखरी बाळेश्वर, साकुर पठारभाग, सारोळे पठार, पोखरी बाळेश्वर, डोळासणे, वनकुटे आदी ...

पावसाने पिकांना दिलासा... बळीराजाला आधार
घारगाव, बोटा, नांदूर खंदरमाळ, माळेगाव पठार, अकलापूर, भोजदरी, पोखरी बाळेश्वर, साकुर पठारभाग, सारोळे पठार, पोखरी बाळेश्वर, डोळासणे, वनकुटे आदी गावांच्या परिसरात पावसाने हजेरी लावल्याने करपत चाललेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. अनेक दिवसांपासून बळीराजा हवालदिल होऊन आभाळाकडे डोळे लावून बसला होता. तालुक्याच्या पठारभागात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. पठारभागात शेतकऱ्यांनी लाल कांदा, बाजरी, सोयाबीन, भुईमूग, वाटाणे आदी पिकांची पेरणी केली आहे. या पावसामुळे खरिपाची पिके तरारली असून, शेतकरी अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
संगमनेर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने दिवसा उन्हाचे चटके, तर रात्री गार वारा यामुळे बळीराजा चिंतित होता. बुधवारी चार वाजल्याच्या सुमारास तालुक्याच्या पठारभागात पाऊस पडण्यास सुरुवात झाल्याने बळीराजा सुखावला आहे. बऱ्याचशा भागात पावसाने हजेरी लावल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. तब्बल वीस दिवसांपासून गायब असलेल्या पावसामुळे पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे खर्च वाया जातो की काय अशी शक्यता निर्माण झाली होती. परंतु, बुधवारी चार वाजेच्या सुमारास पाऊस पडला.
...........
पिकांना जीवदान मिळाले आहे. अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा असल्याचे नांदूर खंदरमाळ येथील शेतकरी गणेश सुपेकर, विजय सुपेकर, गणेश सोनवणे यांनी सांगितले.