अहमदनगर : कोरोनामुळे घसरलेल्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी सरकारने बांधकाम क्षेत्रातील खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरील मुद्रांक शुल्कात ३१ मार्चपर्यंत सवलत देण्यात आली होती. या सवलतीची मुदत संपण्यासाठी सुटीचे दिवस वगळून केवळ तीनच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी वाढली आहे. मात्र ३१ मार्चपर्यंत मुद्रांक शुल्क भरून दस्त नोंदणीची प्रक्रिया चार महिन्यांपर्यंत करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या लॉकडाऊनमधून अर्थव्यवस्था सावरण्यासाठी राज्य शासनाने अनेक निर्णय घेतले होते. त्यामध्ये जागांच्या खरेदी- विक्रीच्या व्यवहारामधील शहरी भागात सहा टक्के मुद्रांक शुल्क द्यावे लागत होते. त्यामध्ये पन्नास टक्के कपात करून केवळ तीन टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागले होते. ही मुदत ३१ डिसेंबरपर्यंत होती. एक जानेवारीपासून सरकारने तीन टक्के सवलत पूर्णपणे बंद करण्याऐवजी एक टक्का सवलत बंद केली आणि ३१ मार्चपर्यंत दोन टक्के सवलत दिली. या सवलतीची मुदत ३१ मार्चला संपत आहे. २६ मार्च, ३० आणि ३१ मार्च असे कामकाजाचे केवळ तीनच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे या ही सवलत मिळविण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात सध्या एकच गर्दी उसळली आहे.
-------
शुल्क भरा, दस्त नोंदणीसाठी चार महिने
खरेदी- विक्रीच्या व्यवहारावर दोन टक्के सवलतीची मुदत ३१ मार्चला संपत आहे. मात्र नागरिकांनी केवळ मुद्रांक शुल्क भरावे, दस्त नोंदणीची प्रक्रिया पुढे चार महिन्यापर्यंत करता येणार आहे. एकाच वेळी मुद्रांक शुल्क भरणे व दस्तनोंदणी करणे यामुळे गर्दी वाढत आहे. शुल्क भरून नोंदणीसाठी पुढे चार महिने नागरिकांना दोन टक्के सवलतीचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे गर्दी करू नये, असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी केले आहे.
-------
रोज ५० ते ६० दस्त नोंदणी
३१ मार्चपर्यंत मुद्रांक शुल्कात दोन टक्के सवलत असल्याने जागांचे खरेदी -विक्री व्यवहार करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील दुय्यम निबंधक कार्यालयात तसेच तालुक्याच्या ठिकाणच्या निबंधक कार्यालयातही नागरिकांची गर्दी वाढली आहे. नगर शहरात सध्या ५० ते ६० दस्तांची नोंदणी होत आहे. त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयाचा ताण वाढला आहे, असे तेथील गर्दीवरून स्पष्ट झाले आहे.
-----------------