बिनविरोध ग्रामपंचायतीवरील राम शिंदेंच्या टीकेला रोहित पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 12:43 IST2020-12-31T12:20:09+5:302020-12-31T12:43:02+5:30

Rohit Pawar And Ram Shinde : राजकीय वादांना संपुष्टात आणण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करा अन् गावच्या विकासासाठी आपल्या गावांना ३० लाखांचा विकासनिधी घ्या, अशी साद आमदार रोहित पवार यांनी घातली आहे.

NCP Rohit Pawar Slams Ram Shinde Over Grampanchayat Election | बिनविरोध ग्रामपंचायतीवरील राम शिंदेंच्या टीकेला रोहित पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले...

बिनविरोध ग्रामपंचायतीवरील राम शिंदेंच्या टीकेला रोहित पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले...

अहमदनगर  - कोरोना महामारीने आपल्याला खूप मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे गावातील सर्व गट-तट बाजूला ठेऊन निवडणुकीसाठी होणाऱ्या खर्चास फाटा देत गावच्या विकासासाठी व हितासाठी ग्रामस्थांनी एकत्र येऊन काम करायचे आहे. आर्थिक खर्च वाचवण्याबरोबरच गावात असलेल्या राजकीय वादांना संपुष्टात आणण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करा अन् गावच्या विकासासाठी आपल्या गावांना ३० लाखांचा विकासनिधी घ्या, अशी साद आमदार रोहित पवार यांनी घातली आहे. यावर बिनविरोध ग्रामपंचायती व्हाव्यात म्हणून बक्षिसे म्हणजे आचारसंहितेचे उल्लंघन आहे अशी टीका राम शिंदे यांनी केली होती. 

राम शिंदे यांच्या टीकेला आता रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "कदाचित गावामध्ये गट तट असावे असा त्यांचा हेतू असावा. माझं म्हणणं आहे की, गावचा विकास करताना गट-तट बाजूला ठेवावं. सामान्य लोकांना केंद्रस्थानी ठेवून राजकीय हेतू बाजूला ठेवून काम करायचं आहे. एखाद्या गावात ग्रामपंचायत बिनविरोध होत असेल तर ती झाल्यावर त्या गावासाठी विकास निधी देऊ असं म्हटल्यास यात काय चुकीचं आहे. त्यांना असं वाटलं असेल की, वेगळ्या पद्धतीने पैसे वाटले जातील. तर तसं काही नाही. त्यांना चुकीचं वाटलं आहे. त्यांना विकासाचं काम कळत नसेल. गट-तट कळत असेल तर त्याला मी काही करू शकत नाही. ते काय बोलतात यापेक्षा लोकांना काय पाहिजे हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे आणि त्याच हेतूने मी यापुढेही काम करत राहीन" असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

बिनविरोध निवडणुका पार पाडलेल्या मोठ्या ग्रामपंचायतींना सी.एस.आर. फंडाच्या माध्यमातूनही अधिकचा निधी देण्यात येणार असल्याचे पवार यांनी बोलताना सांगितले. बिनविरोध निवडणूक ही प्रक्रिया गावच्या हिताची ठरणार आहे. अनेक ग्रामपंचायती बिनविरोध होण्यासाठी सर्वच सुजाण नागरिक प्रयत्नशील असतील, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

...तर याद राखा,गाठ माझ्याशी आहे

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर सर्वसामान्य लोकांना जर कुणी दमबाजी, दबावतंत्र, दडपशाही व अन्य काही मार्गाचा अवलंब करून त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यांची कशीच गय केली जाणार नाही. असा कोणताही प्रकार कुणी करू नये. अन्यथा लक्षात ठेवा गाठ माझ्याशी आहे., असा सज्जड दमच रोहित पवारांनी भरला आहे.


 

Web Title: NCP Rohit Pawar Slams Ram Shinde Over Grampanchayat Election