नगर दक्षिणेतील ३५ गावांमध्ये लवकरच मोबाईल टॉवर बसविणार
केडगाव : नगर दक्षिणेत सुमारे ३५ गावांमध्ये मोबाइलला नेटवर्कची अडचण आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांचा जनसंपर्क तुटला आहे. या भागातील मोबाइल नेटवर्कचा प्रश्न सोडविण्यासाठी भारत सरकारकडे या भागात टॉवर बसविण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. लवकरच या गावांचा प्रश्न मार्गी लागणार आहे, असे प्रतिपादन खासदार सुजय विखे यांनी केले.
आमदार बबनराव पाचपुते यांच्या प्रयत्नातून नगर तालुक्यातील रांजणी येथे विविध विकासकामांचा शुभारंभ विखे यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, बाजार समिती सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष मस्के, सरपंच बाळासाहेब चेमटे, उपसरपंच विजय लिपणे, रेवन चोभे, बन्सी कराळे, बबनराव आव्हाड, बाबा काळे, विठ्ठल वामन, राहुल पानसरे उपस्थित होते. आपण प्रथम युवकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्यक्रम दिला आहे. मुलांच्या भविष्याचा विचार करून शिक्षणासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार असल्याचे विखे यांनी सांगितले. पाचपुते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविडच्या काळात सर्वांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय हा कौतुकास्पद आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून आगडगाव, रांजणी या गावांत सुमारे आठ कोटी रुपयांची रस्त्याची कामे सुरू आहेत.