हिंगणीच्या भगिनींना ‘पाऊस मातीच्या’ कवितांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:26 IST2021-08-25T04:26:47+5:302021-08-25T04:26:47+5:30
देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील हिंगणी येथे रक्षाबंधनाचे औचित्य साधत कवी गणेश आघाव यांनी भगिनींना ‘पाऊस मातीच्या’ कवितांची अनोखी भेट ...

हिंगणीच्या भगिनींना ‘पाऊस मातीच्या’ कवितांची भेट
देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील हिंगणी येथे रक्षाबंधनाचे औचित्य साधत कवी गणेश आघाव यांनी भगिनींना ‘पाऊस मातीच्या’ कवितांची अनोखी भेट देऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला.
भरोसा वेल्फेअर फाउंडेशन व राधाई आधार महिला बचत गट यांच्या माध्यमातून खास महिलांसाठी रक्षाबंधननिमित्ताने कवी गणेश आघाव यांच्या पाऊस मातीच्या कवितांच्या काव्य मैफलीचे आयोजन केले होते. बचत गटाच्या अध्यक्षा अनिता शिंदे यांनी कवी गणेश आघाव यांना राखी बांधली. त्यानंतर सासर-माहेर, सासू-सून, संतांची वारी, लेक, सये, पाऊस, पाणी, हिरवळ, मातीच्या कविता अशा कवितांच्या सुरेल आवाजात त्यांनी गायन केले.
१९२१ साली कवी कै. ग. ह. पाटील हे हिंगणीमध्ये आले होते. तेव्हा त्यांनी हिंगणी गावावर ‘हिंगणी एक ओसाड खेडे’ ही कविता सुगी या काव्यसंग्रहात लिहिली होती. बरोबर १०० वर्षांनी गावातीलच असणाऱ्या राधाबाई शिंदे व नवनाथ शिंदे या मायलेकरांनी ‘हिंगणी गाव माहे ग’ ही गावच्या प्रगतीवर लिहिलेली कविता या वेळी नवनाथ शिंदे यांनी सादर केली.
या वेळी उपसरपंच मनीषा शिंदे, माउली शिंदे, भाऊसाहेब शिंदे, प्रा. डॉ. दत्ता असवले तसेच महिला बचतगटांच्या अनेक महिला उपस्थित होत्या. प्रास्ताविक नवनाथ शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन निवेदक रावसाहेब चक्रे यांनी केले. आभार सुरेश शिंदे यांनी मानले.
240821\img_20210823_205248.jpg
कवी गणेश आघाव