राष्ट्रवादीने केले उड्डाणपुलाचे नामकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:27 IST2021-09-08T04:27:34+5:302021-09-08T04:27:34+5:30
अहमदनगर : शहरातील यश पॅलेस ते डीएसपी चौक दरम्यान काम सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात असताना राष्ट्रवादी काँग्रेसने ...

राष्ट्रवादीने केले उड्डाणपुलाचे नामकरण
अहमदनगर : शहरातील यश पॅलेस ते डीएसपी चौक दरम्यान काम सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात असताना राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी उड्डाणपुलाचे नामकरण केले आहे. ‘ छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल ’ असा फलक लावण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यास सर्वांचीच संमती असणार आहे. मात्र राष्ट्रवादीकडून नामकरणाची घाई कशासाठी? अशी चर्चा आता रंगली आहे.
नगर शहरातील जुने बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर उड्डणपुलाच्या नामकरण फलकाचे अनावरण करुन नारळ फोडण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, नगरसेवक प्रकाश भागानगरे, युवक शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे, विद्यार्थी सेलचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र भांडवलकर, शहराध्यक्ष वैभव ढाकणे, सागर गुंजाळ, निलेश बांगरे, संतोष ढाकणे, भरत गारूडकर, अमोल कांडेकर, राजेंद्र भालेराव, निलेश इंगळे, वैभव म्हस्के, शहानवाझ शेख, सुफियान शेख, वसीम शेख, मिजान कुरेशी, संतोष हजारे, अजय गुंड पाटील, जाकीर शेख, हाफिज शेख, शाहरुख शेख आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत उड्डाणपुलाच्या खांबांना नामकरणाचे पत्रके चिकटविण्यात आली. यापूर्वी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलच्या वतीने सदर उड्डाणपुलास शिवाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र प्रशासनाने सदर मागणीकडे दुर्लक्ष केल्याने उड्डाणपुलाचे जाहीर नामकरण करण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.
दरम्यान उड्डाणपुलासाठी अनेक राजकीय नेत्यांनी त्यांची प्रतिष्ठा पणाला लावली. उड्डाणपुलाचे काम केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने खासदार डॉ. सुजय विखे यांनी प्रयत्न करून पुलाचे काम सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला होता. गत महिन्यात सुजय विखे व आमदार संग्राम जगताप यांनी पुलावरून एकत्र फोटोसेशन केले होते. त्यामुळे उड्डाणपुलाचे लोकार्पण, नामकरण आदी कार्यक्रमांना आता ही दोन्ही नेते एकत्र असतील, असा कयास बांधला जात होता. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या या अचानक झालेल्या कृतीमुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याला सर्वांचीच संमती राहणार आहे. मात्र नामकरणाची ही घाई कशासाठी? अशा प्रश्न नगरमध्ये उपस्थित झाला आहे.
---------
उड्डाणपुलाला शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा बांधकाम विभागाला प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला सदर विभागाने उत्तर न दिल्याने आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुलाचे नामकरण करण्यात आले आहे. शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव मिळाल्यानंतर त्याला विनाविलंब मंजुरी देण्याची गरज होती. मात्र तसे न झाल्याने ही कृती करण्यात आली.
-प्रा. माणिक विधाते, शहर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस
----------
फोटो- ०७ एनसीपी
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी नगर येथील उड्डाणपुलाचे नामकरण केले. यावेळी प्रा. माणिक विधाते व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते. (छायाचित्र- साजिद शेख)