नेवासा : बीएस्सी ॲग्रीसाठी प्रवेश द्या या मुख्य मागणीसाठी नेवासा तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील सदस्य असलेल्या कृषी पदवीधारकांनी सोमवारी नेवासा तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
कृषी पदवीधारक यज्ञेश संजय नागोडे हा विद्यार्थी उपोषणाचे नेतृत्व करीत आहे.
कृषी पदवीकेसाठी डिप्लोमा केल्यानंतर बीएस्सी ॲग्रीसाठी प्रवेश मिळतो. मात्र, प्रवेश नाकारल्याने कृषी पदवीधारक विद्यार्थी यज्ञेश नागोडे या विद्यार्थ्याने काही दिवसांपूर्वीच उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र, प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने त्याने सोमवारी तहसीलसमोर उपोषण सुरू केले.
यावेळी यज्ञेश नागोडे म्हणाला, भेंडा येथील जिजामाता कृषी महाविद्यालयात तीन वर्षांचा डिप्लोमा पूर्ण केला. कृषी पदविका प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना सलग दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळतो. मात्र, आम्हाला डिग्रीसाठी प्रवेश नाकारला गेला आहे. त्यास राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ व शासनाचे चुकीचे धोरण कारणीभूत आहे.
मयूर जावळे, सचिन पेहरे, आदेश भोसले, साईनाथ चौघुले, अभिजित शेळके, नीलेश गाडेकर, अनिकेत औटी, आकाश शिंदे, प्रवीण शिंदे, विकास काळे,
राहुल बर्फे, अभय गणगे, रामेश्वर गणगे या विद्यार्थ्यांनी उपोषणात सहभाग नोंदविला आहे.
----
२६ नेवासा उपोषण
नेवासा येथे कृषी पदवीधारकांनी सोमवारी सकाळी उपोषण सुरू केले.