संगमनेरातील उद्योजकाने स्वीकारले निराधार १५ मुलींचे पालकत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:15 IST2021-07-12T04:15:03+5:302021-07-12T04:15:03+5:30
संगमनेर : कोरोनाच्या संकटाने प्रत्येकालाच ग्रासले आहे. संकटाशी दोन हात करत जगण्या-मरण्याचा संघर्ष सुरू असताना अनेक कुटुंबातील कर्त्या व्यक्ती ...

संगमनेरातील उद्योजकाने स्वीकारले निराधार १५ मुलींचे पालकत्व
संगमनेर : कोरोनाच्या संकटाने प्रत्येकालाच ग्रासले आहे. संकटाशी दोन हात करत जगण्या-मरण्याचा संघर्ष सुरू असताना अनेक कुटुंबातील कर्त्या व्यक्ती कोरोनाने गेल्या. आई-बाप गेल्याने बालके निराधार झाली. अशा बालकांचे आयुष्य अस्थिर होऊ नये, यासाठी संगमनेरातील उद्योजक नितीन हासे यांनी ‘एक हात मदतीचा’ हा उपक्रम हाती घेतला असून त्या माध्यमातून त्यांनी निराधार १५ मुलींचे पालकत्व स्वीकारले आहे.
संगमनेर तालुक्यातील राजापूर येथील रहिवासी नितीन हासे हे शेतकरी कुटुंबातील तरुण. त्यांच्या कुटुंबात उद्योग, व्यवसायाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना त्यांनी औद्योगिक वसाहतीमध्ये सह्याद्री ॲग्रोव्हेट नावाची छोटीशी कंपनी सुरू केली. दुभत्या जनावरांसाठी रबर गादी, दूध काढणी यंत्र, कडबा कुटी, घरगुती पिठाची गिरणी आदीची निर्मिती त्यांच्या कंपनीत होते. छोट्याशा कंपनीचा विस्तार आज अहमदनगर बरोबरच पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये तसेच कर्नाटक, गुजरात या राज्यात वाढून त्यामाध्यमातून मोठा रोजगार निर्माण झाला आहे. कोरोनामुळे एका शेतकरी कुटुंबातील पती-पत्नीचे निधन झाले. शालेय शिक्षण घेणारी त्यांची मुलगी निराधार झाल्याचे उद्योजक हासे यांना समजले. त्यांनी त्या मुलीच्या नातेवाईकांची भेट घेतली. मुलीच्या शिक्षणाबरोबरच तिच्या उदरनिर्वाहासाठी लागणारी विशिष्ट रक्कम ते तिच्या नातेवाईकांकडे दर महिन्याला पाठवितात. सात जिल्ह्यांमध्ये सह्याद्री ॲग्रोव्हेट कंपनीचे कार्यक्षेत्र आहे. कोरोनामुळे अथवा इतर कारणांनी शेतकरी, शेतमजूर कुटुंबांतील कर्त्या व्यक्तीचे निधन झाले असल्यास अशा कुटुंबातील मुलींचा शोध घेऊन त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल? याचे सर्वेक्षण त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना करण्यास सांगितले. सर्वेक्षणात पहिल्यांदा दोन, पाच, सहा अशा गरजू मुली समोर आल्या. आतापर्यंत एकूण १५ गरजू मुलींना त्यांच्या शिक्षणाला, उदरनिर्वाहासाठी ठरवून दिलेली विशिष्ट रक्कम त्यांच्या नातेवाईकांकडे दर महिन्याला पोहोच करण्यात येते. या मुलींचे शालेय, महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होऊन त्यांना नोकरी मिळेपर्यंतची जबाबदारी उद्योजक हासे यांनी स्वीकारली आहे. भविष्यात निराधार मुलांसाठी निवासी शाळा सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे.
---------------
कर्मचाऱ्यांनी उचलला खारीचा वाटा
कोरोना संकटात अनेक उद्योजक, व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले. अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्यात आली. काहींना कामावरून काढून टाकण्यात आले. सह्याद्री ॲग्रोव्हेट या कंपनीत १७० जण वेगवेगळ्या पदांवर काम करतात. त्यातील कुणाचीही पगार कपात केली नाही अथवा कुणालाही काढून टाकले नाही. वेगवेगळ्या पदांवर काम करणाऱ्यांपैकी बहुतांशी जणांनी उद्योजक नितीन हासे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमात ऐच्छिक सहभाग नोंदवत खारीचा वाटा उचलला आहे.
------------------