निघोज : निघोज (ता.पारनेर) येथील ग्रामपंचायत सदस्य अपहरण प्रकरणातील आठ जणांचे अटकपूर्व जामीन खेड (जि.पुणे) येथील सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
निघोज येथील सरपंच, उपसरपंच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिगंबर लाळगे व गणेश कवाद या दोन ग्रामपंचायत सदस्यांचे २० ते २५ जणांच्या टोळक्याने शस्त्राचा धाक दाखवून अपहरण केल्याबाबतची फिर्याद विठ्ठल कवाद यांनी दिली होती. त्यानुसार अहपरणाचा गुन्हा खेड पोलीस ठाण्यात दाखल झाला होता.
निघोज ग्रामपंचायतमध्ये १७ सदस्य आहेत. निवडणुकीत वराळ पॅनलला ८ जागा, ग्रामविकास पॅनल, मोरवाडी रसाळवाडी, तिसरी आघाडी पॅनल असे ९ सदस्य निवडून आले. त्यातील नऊ सदस्य सहलीवर गेले होते. सरपंचपदाची निवडणूक ९ फेब्रुवारी २०२१ ला होती. त्यातील गणेश कवाद व दिगंबर लाळगे यांचे खेडमधून दोन दिवस अगोदरच अपहरण झाले. त्यामुळे त्या दोघांना मतदानापासून वंचित राहावे लागले होते. सुटका झाल्यानंतर दिगंबर लाळगे व गणेश कवाद यांनी झालेले सत्यकथन पोलीस जबाबात नोंदविले.
आरोपींपैकी ग्रामपंचायत सदस्य सचिन वराळ, मंगेश वराळ यांचा खेड सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने अटी-शर्तींसह त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. मात्र यामधील सुनील वराळ, नीलेश घोडे, अजय वराळ, राहुल वराळ, स्वप्नील दुनगुले, सुभाष वराळ, आकाश वराळ, धोंडिबा जाधव यांचा अटकपूर्व जामीन खेड सत्र न्यायालयाने फेटाळला.
आरोपींनी केलेले कृत्य अतिशय गंभीर स्वरूपाचे आहे. गुह्याच्या पुढील तपासासाठी आरोपींच्या पोलीस कोठडीची गरज असल्याने आरोपींचा जामीन नामंजूर करत असल्याचा निकाल देण्यात आला. आरोपींना तपासासाठी पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा करते वेळी वापरलेली वाहने, हत्यारे व इतर मुद्देमाल ताब्यात घेण्याचा आदेश न्यायालयाने दिला.