हेमंत आवारी... अकोलेवय वर्षे ९०़़, आजही ब्रिटिशकालिन भंडारदरा धरणाचा पाठीचा कणा ताठ असून स्थापत्य शास्त्राचा हा अप्रतिम ठेवा आहे. अवघे ८४ लाख रुपये खर्चून हे धरण बांधण्यात आले. आधी शेती सिंचनासाठी पाट-कालवे नंतर दगडी रेखीव भक्कम धरण अशी योजना करुन ब्रिटिशांनी बांधलेल्या जल मंदिराच्या आधारावरच उत्तर नगर जिल्ह्याची शेती फुलली आहे. तसेच समन्यायी पाणी वाटपातून मराठवाड्याला पाणी मिळत आहे.१८७५ ला श्रीरामपूर -राहाता भागात पाण्यासाठी कालवे (पाट) झाले. त्या पाटाला पाणी मिळावे म्हणून संगमनेर तालुक्यात ओझर येथे १८८५ ला ‘पिकअप वॉल’ बांधण्यात आली.१९०५ ला धरणाच्या जागेचे सर्वेक्षण होत १९१० ला भंडारदरा धरणाच्या कामास सुरुवात झाली. गूळ-चुनखडीतील हा दगडी चिऱ्यांचा विल्सन डॅम १९२६ ला पूर्णत्वास गेला. उत्तर नगर जिल्ह्याला जलसंजीवनी मिळावी म्हणून प्रवरेच्या उगमस्थानी ब्रिटिशांनी हा ‘अर्थर लेक’ बांध घातला. त्यावेळी साधन सामुग्री फारशी नसतानाही केवळ १६ वर्षात १० हजार ८६ दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमतेचे दगडी धरण तयार झाले. ४७ चौरस किलोमीटर पाणलोट क्षेत्र असलेल्या धरणाच्या भिंतीची उंची २७८ फूट असून केवळ ८४ लाख १४ हजार १८८ रुपये धरणासाठी खर्च झाले आहेत. २३ हजार ७७ हेक्टर सिंचन क्षमतेच्या भंडारदरा धरणाचे पूर्वीचे नाव ‘विल्सन डॅम’ असे असून ‘आधी कालवे मग धरण’अशी प्रकल्पाची ख्याती आहे. १८८५ च्या दरम्यान ओझर उन्नेय बंधाऱ्यापासून पुढे डावा कालवा ७६ व उजवा कालावा ५३ किलोमीटर लांबीचा असून यामुळे नगर उत्तर जिल्हा बागायती गणला जावू लागला आहे.१९७३ सालाच्या दरम्यान भंडारदरा धरणाच्या भिंतीचे बळकटीकरण करण्यात आले. त्यात १३१ बोअर घेऊन त्यात शिसे ओतण्यात आले असून त्यामुळे ५४० टनाने भिंतीची दाब क्षमता वाढली आहे. तसेच १९४ बोअर घेवून त्यात प्री स्ट्रेस केबल टाकण्यात आली आहे. केबलचे वजन २१० टन व लांबी १० हजार ५५३ फूट आहे. सपोर्टीव्ह दगडी भिंत ‘१४ बटरेस’ बांधण्यात आली आणि ‘स्पिल वे’ गेट बसविण्यात आले. यातून प्रती सेकंदाला ५३ हजार क्युसेक पुराचे पाणी वाहून जाऊ शकते. सर्व उपाय योजनांमुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सह्याद्रीचा काळा पाषाण ‘बेसॉल्ट’ खडकावर ८५ मीटर उंचीचा ११ हजार ३९ दलघफु इतका पाणीसाठा कवेत घेवून भंडारदरा धरण दिमाखात उभे आहे. येथील खडकाची दाब सहन करण्याची क्षमता ७ हजार मेट्रीक टन इतकी आहे. पाण्याचा ६० टक्के दाब जवळच्या टेकडीवर स्थिरावतो व केवळ ४० टक्के दाब हा भिंतीवर येतो असे ‘ इंजिनिअरिंग तंत्र’ या धरणासाठी वापरण्यात आले आहे.
‘भंडारदरा’ स्थापत्यशास्त्राचा अप्रतिम ठेवा
By admin | Updated: September 14, 2016 23:22 IST