दातीर खून प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला तत्काळ अटक करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:20 IST2021-04-16T04:20:47+5:302021-04-16T04:20:47+5:30
अहमदनगर : राहुरी तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे जनता भयभीत झाली आहे. या तालुक्यामध्ये यापूर्वी चार ...

दातीर खून प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला तत्काळ अटक करा
अहमदनगर : राहुरी तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे जनता भयभीत झाली आहे. या तालुक्यामध्ये यापूर्वी चार खून झाले असून, आत्तापर्यंत त्या खुनांचा तपास लागलेला नाही. यातील आरोपी हे मोकाट फिरत आहेत. पत्रकार रोहिदास दातीर यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपीही अद्याप सापडलेले नाहीत. पोलिसांनी त्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन केली.
दातीर यांनी वेळोवेळी राहुरी पोलीस स्थानकाकडे संरक्षणाची मागणी केली होती. परंतु, त्यांना कुठल्याही प्रकारचे पोलीस संरक्षण दिले गेले नाही. त्यांचे अपहरण झाल्यानंतरही त्यांच्या पत्नीने अपहरणाचा गुन्हा दाखल करून तत्काळ आरोपींना अटक करावी, अशी मागणी केली होती. परंतु, पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे पत्रकार रोहिदास दातीर यांचा जीव गेला. आता राजकीय दबावापोटी पोलिसांचा तपास हा संशयास्पद असून, हा तपास स्थानिक गुन्हे शाखा किंवा सीआयडीकडे वर्ग करावा तसेच सध्या तपास करत असलेल्या पोलीस निरीक्षकांची तत्काळ बदली करावी व तपास यंत्रणेतील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी केली. दातीर कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी लवकरच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांची भेट घेणार आहे. पोलीस प्रशासनाने तपास करताना सायबर सेल व संबंधित आरोपींचा सीडीआर तपासावा जेणेकरून या हत्याकांडामागील मुख्य सूत्रधार समोर येण्यास मदत होईल, अशी मागणी शिंदे यांनी केली. गुरुवारी दातीर कुटुंबियांची भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी शिंदे यांच्यासमवेत माजी मंत्री शिवाजी कर्डिले, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, आदी उपस्थित होते.
या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू असून, यामधील आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामागील मुख्य सूत्रधार व मुख्य आरोपीलाही लवकरच अटक केली जाईल. दातीर यांनी संरक्षण मागूनही का दिले गेले नाही, त्याचीही चौकशी करू, असे आश्वासन अधीक्षक पाटील यांनी शिष्टमंडळाला दिले.