मंत्री तनपुरे यांनी शुक्रवारी सकाळी जिल्हा परिषदेत अध्यक्षांच्या दालनात राहुरी तालुक्यातील कामांबाबतचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला अध्यक्षा राजश्री घुले, बाबासाहेब भिटे, सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, पाणीपुरवठा व स्वच्छताचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे, ग्रामीण पाणीपुरवठाचे कार्यकारी अभियंता प्रकाश खताळ आदी उपस्थित होते.
तनपुरे यांनी प्रारंभी ज्या गावात विकासकामे सुरू आहेत, तेथे नेमक्या कोणत्या कारणांमुळे ती थांबली आहेत, हे समजावून घेतले. कोरोनामुळे अनेक कामांची गती मंदावली असली, तरी आता कामांना वेग देणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने यंत्रणांनी कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांची स्थिती, त्यासाठी येणाऱ्या अडचणी, विकासकामांसाठी निधी मिळण्याबाबत येणाऱ्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या. ज्या गावांची कामे किरकोळ कारणांसाठी रखडलेली असतील, ती मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
विशेषत: बारागाव नांदूर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, राहुरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि तेथील पायाभूत सुविधा, नव्या उपकेंद्रांचे प्रस्ताव आणि त्याची सद्यस्थिती आदींची माहिती त्यांनी घेतली. जिल्हा नियोजन समिती अथवा ज्या ठिकाणाहून निधी प्राप्त होईल, त्यासाठीचा आवश्यक आराखडा, प्रस्ताव वेळेत सादर होणे आणि त्यासाठी पाठपुरावा करणे अपेक्षित आहे. राज्य स्तरावर या संदर्भात काही बाबी प्रलंबित असतील, तर त्याही निदर्शनास आणून द्यावात, असे त्यांनी स्पष्ट केले.
--------
फोटो - २३तनपुरे बैठक
नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेत राहुरी तालुक्यातील कामांबाबतचा आढावा घेतला. यावेळी अध्यक्षा राजश्री घुले, तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.