प्रेमाचे दोन शब्द, वेळ आणि बरेच काही....
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 17:10 IST2020-04-01T17:07:21+5:302020-04-01T17:10:12+5:30
इंटेलिजन्स कोषापेक्षा भावनिक कोष हा महत्त्वाचा असतो

प्रेमाचे दोन शब्द, वेळ आणि बरेच काही....
डॉ. दत्ता कोहिनकर-
पालकांनी लहानपणापासून मुलामुलींना वेळ, प्रेम दिले पाहिजे.तसेच वेळॊवेळी त्यांचे कौतुक करण्यास देखील आपण पालक या नात्याने विसरता कामा नये. या छोट्या छोट्या गोष्टीतच आयुष्यातील यश, नातेसंबंध, भावनिकता यांची खूप खूप मोठी गणिते लपलेली असतात. सातत्याने आपल्या पाल्यांमध्ये आपलेणाची भावना निर्माण केली गेली पाहिजे. तसेच आपल्या आचरणातून चांगले संस्कारांनी त्यांचे आयुष्य घडवले तरच त्यांना उज्ज्वल भवितव्याकडे त्यांची वाटचाल होईल नाहीतर घराघरात हिंसक, रागीट, गुन्हेगारी प्रवृत्तीने भरकटलेले आणि आई वडिलांशी, समाजाशी उद्धटपणे वागणारी पिढी निर्माण होईल त्यामुळे वेळीच आपण काळजी घेतली पाहिजे.
मुलांचे वय किती आहे यावर जाऊ नका . मनाला वय नसते.ते प्रेमाचे भुकेले असते . मानस शास्त्रानुसार ज्या मुलांना शालेय जीवनापासून प्रेम , आदर , स्पर्श , कौतुकाची थाप पालकांनी दिलेली असते ती मुले भावानिक आणि तितकीच परिपक्व होतात . त्यांचा भावनिक कोष मजबूत होतो . कितीही बिकट परिस्थिती आली तरी ही मुले त्यातून वाट काढतात . कधीही नैराश्याच्या अधीन जाऊन स्वतःचं आयुष्य उध्वस्त करत नाही किंवा आत्महत्या करत नाही . म्हणून इंटेलिजन्स कोषापेक्षा भावनिक कोष हा महत्त्वाचा असतो. त्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यायला हवा ..
हल्ली लहानवयातच मुलांच्या अपेक्षा वाढू लागल्या आहेत. तसेच त्यांचे पालक आपणमुलाला वेळ देऊ शकत नाही तर त्यांच्या समाधान, आनंदासाठी हाती गरजेपेक्षा अधिक आणि महागातल्या वस्तू देऊ लागले. यामुळे मुलांमधला संयम हरवतो आहे आणि त्यांचा स्वभाव नकळत चिडखोर आणि एकलकोंडी होत आहे. बाल सुधारगृहातील कितीतरी मुले उच्चशिक्षित व आर्थिक समृद्धता असलेल्या कुटुंबातील असतात. खरंतर त्यांचे आई वडील संस्काराने देखील आपल्याला घडवायला कमी पडलेले नसतात तर मुलांना वेळ देण्यात अपयशी ठरतात.
आईचे वात्सल्य , नैसर्गिक प्रेम , स्पर्श त्यांना मिळाला नाही कि ही प्रेमाची भुकेली मुले मिळालं नाही ते ओरबडून मिळवण्याचा प्रयत्न करतात, त्यातून असे हल्ले, चोरी, लैंगिक अत्याचार अशा गुन्ह्यांमध्ये सापडत वाममार्गाला लागत आहे.
तुमच्याच हातात आहे उद्याची युवापिढी आणि आणि त्यांचं आदर्श , मूल्यधिष्ठित, सुसंस्कारित जीवनाची घडी... तिच्याच यशाच्या शिखरावर तुम्हाला आनंदाचे दान मिळणार आहे.. !