लग्न कधी करावं?... 'या' ५ गोष्टी नक्की दाखवतील दिशा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2018 02:09 PM2018-02-23T14:09:30+5:302018-02-23T14:37:41+5:30

लग्न म्हणजे दोन मनांचं मीलन. एकमेकांवर प्रेम करणारी दोघं एका हव्याहव्याशा बंधनात बांधली जातात आणि एकरूप होतात. हा त्या दोघांच्याही आयुष्यातला 'टर्निंग पॉइंट'च असतो. स्वाभाविकच, हे पाऊल विचारपूर्वकच टाकलं गेलं पाहिजे. प्रेमाला वयाचं बंधन नसतं. लग्नासाठी कायद्याने वयाचं बंधन घालून दिलंय. ते पाळायलाच हवं. पण, त्याहीपेक्षा आपण लग्नासाठी मानसिकदृष्ट्या तयार आहोत का, हे ओळखणंही गरजेचं आहे. त्यासाठीच काही टिप्स...

१) तुम्ही वैयक्तिक आयुष्यात आनंदी आहात! दुसऱ्या व्यक्तीला स्वत:च्या आनंदात सहभागी करायचं असेल तर आधी तुम्ही स्वतः आनंदी असायला हवं. जर तुम्ही स्वत:च्या आयुष्यात आनंदी असाल, तर तुम्ही लग्नाचा विचार करायला हरकत नाही.

२) स्वत:च्या नात्याची तुलना इतरांशी करत नसाल तेव्हा प्रेमात व लग्नात खूप मोठा फरक असतो. तसंच प्रत्येकाची प्रेमाची गोष्ट वेगळी असते. म्हणून तुम्ही तुमच्या जोडीदाराची तुलना इतरांशी करत नसाल तरच तुम्ही लग्न करण्यासाठी सक्षम असू शकता.

३) जोडीदाराशी असलेलं बॅांडिंग तुम्हाला आवडतंय! तुम्ही तुमच्या नात्यात जर प्रत्येक छोटी गोष्ट एकमेकांशी शेअर करत असाल किंवा करणार असाल तर तुम्ही तुमचं आयुष्य एकमेकांसोबत नक्की आनंदात घालवू शकता. कारण कोणत्याही नात्यात सिक्रेट्स आले की ते नातं जास्त काळ टिकत नाही.

४) भूतकाळातील गोष्टींचा विचार नको! लग्नाचा विचार करत असाल तर तुम्हाला तुमच्या भविष्याचा विचार करण्याची गरज असते. भूतकाळातील काही वाईटआठवणींना पूर्णविराम देऊन नव्याने आयुष्य सुरू करायला हवं. त्याची तयारी असेल तर लगीनगाठ बांधण्यासाठी एक पाऊल पुढे टाका.

५) जोडीदाराला चांगल्या व वाईट काळात साथ देण्याची तयारी भविष्यात काय घडेल याची खात्री कुणीच देऊ शकत नाही. म्हणून चांगल्या व वाईट काळात नेहमीच जोडीदाराला साथ देण्याची तुमची तयारी असेल तरच तुम्ही लग्नाचा विचार करावा.