'सामाजिक, राजकीय जीवनात काम करतो, आम्हालाही प्रपंच, परिवार आहे'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 02:47 PM2021-07-02T14:47:18+5:302021-07-02T14:57:10+5:30

महाराष्ट्र राज्य सहकार बँक घोटाळ्याप्रकरणात ईडीने (ED) मोठी कारवाई केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांचा साखर कारखाना जप्त करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य सहकार बँक घोटाळ्याप्रकरणात ईडीने (ED) मोठी कारवाई केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांचा साखर कारखाना जप्त करण्यात आला आहे.

अजित पवारांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या साताऱ्यातील जरंडेश्वर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिलं आहे.

ईडीकडून येथे झालेल्या कारवाईशी माझा काहीही संबंध नाही, असेही ते म्हणाले. जरंडेश्वर साखर कारखाना पूर्वी सहकारी कारखाना होता. महाराष्ट्र सहकारी बँकेचं कर्ज फेडू न शकल्याने त्या कारखान्याचा लिलाव करण्यात आला. नंतर तो कारखाना खासगीरित्या विकत घेतला गेला. सध्या अजित पवारांचे निकटवर्तीय हा कारखाना चालवत होते.

त्यामुळे आता अजित पवारांचीही ईडी चौकशी होणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, अजित पवार यांनी पत्रकारांच्या प्रश्नांवर उत्तरे देत या कारखान्यासंदर्भात इतंभू माहिती दिली.

ईडीकडून गुरू कमॉडिटीसंदर्भात काही चौकशा सुरू आहेत, त्यामुळे त्यांनी या कारखान्याची माहिती घेतली. मात्र, सध्या हा कारखाना जरंडेश्वरद्वारे चालविला जात आहे. गुरू कमोडिटीचे मुंबईतील ओंकार असं काहीतरी त्यांचं नाव आहे. त्यांच्या कंपनीशी माझा दुरान्वये संबंध नाही, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं आहे..

आरबीआय आणि नाबार्डनं कडक नियमावली केली आहे, त्याची पूर्तता केल्याशिवाय हे कर्ज देता येत नाही. आम्ही राजकीय जीवनात, सामाजिक जीवनात काम करत असतो. गेल्या 30 वर्षांपासून आम्ही काम करतोय, आम्हाला पण परिवार आहे, आम्हाला पण प्रपंच आहे.

त्यासंदर्भात 20 कोटी आणि वरी काही लाख रुपये असल्याचं सांगतात. ते पैसे चेकचे आहेत का ते तपासा, सोर्स कुठला आहे हे तपासा ते सगळं स्वच्छ असल्याचं स्पष्ट आहे, असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.

जरंडेश्वरच्या डायरेक्टरने ईडीच्या ऑफिसरला सर्वकाही दाखवलं आहे. नियमाच्या आधीन राहूनच या कंपनीला कर्जवाटप करण्यात आलं आहे. कागदपत्रांची पूर्तता असल्याशिवाय बँका 400 कोटी रुपयांचं कर्ज देऊच शकत नाही. सध्या वर्षाला 60 ते 65 कोटी रुपये हफ्ता कारखान्याकडून जात आहे.

त्या भागातील सर्वात जास्त रिकव्हरी असलेला हा कारखाना आहे, तेथील मॅनेजमेंटही चांगलं असल्याचं तेथील स्थानिक सांगतात, असे म्हणत अजित पवार यांनी सध्या कारखाना चांगल्यारितीने चालविला जात असल्याच म्हटलं आहे.

आम्ही यापूर्वी काही कंपन्यांवर डायरेक्टर होतो, पण डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधान असताना त्यांनी देशातील सर्वच मंत्र्यांना एखाद्या कंपनीच्या डायरेक्टरपदी न राहण्याचं आवाहन केलं होतं.

त्यावेळी, आम्ही ते पद सोडून दिले, असेही अजित पवार यांनी सांगितलं. मुंबई उच्च न्यायालयाने हा कारखाना विक्रीस काढला होता, त्यामुळे तो बळकावण्याचा विषयच नाही.

माझ्यावर यापूर्वीपासूनच असे आरोप झाले आहेत. विशेष म्हणजे सर्वात जास्त किंमतीला जरंडेश्वर साखर कारखाना विकला असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.

12 ते 15 कंपन्यांपैकी मुंबईतील गुरू कमोडिटी या कंपनीने जादा दराने 65 कोटी 75 लाख रुपये दराने टेंडर भरल्यामुळे हा कारखाना या कंपनीला विकला गेला होता.

बीव्हीजी ग्रुपचे हनुमंत गायकवाड यांनी गुरुशी संपर्क साधून हा साखर कारखाना चालवायला घेतला. पहिल्याच वर्षी त्यांना जवळपास 4 ते 5 कोटी तोटाच झाला.

त्यानंतर, माझे नातेवाईक आहेत, राजेंद्र घाडगे यांनी हा कारखाना चालवायला घेतला, त्यांनाही 2 वर्षे तोटाच झाला. त्यामुळे, त्यांनी बँकांशी चर्चा करुन रीतसर परवानग्या घेऊन कर्ज काढून विस्तारवाढ केल्याचे अजित पवार यांनी सांगितले.