Arpita Mukherjee : "पैसे माझे नाहीत, ते माझ्या अनुपस्थितीत..."; 'कॅश क्वीन' अर्पिता मुखर्जीचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 04:16 PM2022-08-02T16:16:23+5:302022-08-02T16:33:49+5:30

Arpita Mukherjee : पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या अर्पिता मुखर्जीने मोठा दावा केला आहे.

पश्चिम बंगालमधील ममता सरकारमध्ये मंत्री असलेले पार्थ चॅटर्जी सध्या देशभरात चर्चेत आले आहेत. पार्थ चॅटर्जीला ईडीने अटक केली आणि चॅटर्जीची सहकारी अर्पिता मुखर्जीच्या (Arpita Mukherjee) घरांवर छापेमारी केली. यात आतापर्यंत 50 कोटींहून अधिकची रोख आणि अनेक किलो सोने सापडले आहे. ईडीच्या पथकाने अर्पिताच्या दुसऱ्या फ्लॅटवर छापा टाकल्यानंतर सापडलेली रक्कम पाहून अधिकारीही चक्रावले.

पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या अर्पिता मुखर्जीने मोठा आरोप केला आहे. माझ्या घरातून जप्त केलेले पैसे माझे नाहीत असं तिने म्हटलं आहे. माझ्या गैरहजेरीत हे पैसे तिथेच ठेवल्याचा दावा तिने केला. याआधी पार्थ चॅटर्जी यानीही हे पैसे आपल्या मालकीचे नसल्याचा दावा केला आहे. चॅटर्जीने आपण या कटाचा बळी ठरल्याचं देखील म्हटलं आहे.

ईडीने याआधी घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेले पार्थ चॅटर्जी तपासात सहकार्य करत नसल्याचं सांगितलं होतं. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "चॅटर्जीने घोटाळ्याच्या चौकशीसंदर्भात ईडीच्या बहुतेक प्रश्नांची उत्तरे दिलेली नाहीत. चौकशीदरम्यान ते बहुतांश वेळा गप्प होते. अटक झाल्यापासून तो आम्हाला सहकार्य करत नाही."

"चॅटर्जी अनेकदा थकल्याची तक्रार करतो आणि आमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास टाळतो. आम्ही चॅटर्जी यांना त्याच्या दाव्यांबद्दल विचारले की छाप्यात जप्त केलेली रक्कम त्यांची आहे की नाही? आम्ही या पैशाचा स्रोत शोधत आहोत." ईडीने पार्थची सहकारी आणि या शिक्षक भरती घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या अर्पिता मुखर्जीच्या ठिकाणांवर छापेमारी केली.

अर्पिता मुखर्जीच्या आठ बँक खात्यांमधून 8 कोटी रुपयांचे व्यवहार आढळून आले आहेत. ईडीने ही आठ खाती आधीच गोठवली आहेत. ईडीचे अधिकारी आता या खात्यांद्वारे झालेल्या व्यवहारांचा शोध घेत आहेत. एवढी मोठी रक्कम कोणत्या खात्यांमधून आली आणि ती कुठे पाठवली गेली, याचा शोध ईडी घेत आहे.

गरज असल्यास, एजन्सी खात्यांचे फॉरेन्सिक ऑडिट देखील करू शकते. रिमांडचा कालावधी केवळ तीन असल्याने सध्या ईडीकडे पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता मुखर्जी यांच्याकडून माहिती मिळविण्यासाठी केवळ तीन दिवस शिल्लक असल्याचं म्हटलं जात आहे. ईडीच्या पथकाने 55 कोटींहून अधिकचा काळा पैसा जप्त केला आहे.

दोन हजारांच्या नोटांच अक्षरशः ढिग सापडला. एवढेच नाही तर सोन्याच्या वीटा, दागिने, विदेशी चलन आणि मालमत्तेची कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. ईडीच्या गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या दोन छाप्यांमध्ये आतापर्यंत एकूण 50.36 कोटी रुपये रोख आणि 5.07 कोटी रुपयांचे सोने सापडले आहे

ईडीच्या छाप्यात 55.43 कोटींहून अधिकची रक्कम सापडली आहे. सोन्याची एकूण रिकव्हरी सुमारे 5 किलो आहे, ज्यामध्ये 1-1 किलो वजनाच्या 3 सोन्याच्या वीटा आहेत, अर्धा किलोपेक्षा जास्त वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या आणि सोन्याच्या पेनाचा समावेश आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

अर्पिता मुखर्जीच्या आईला आपल्या लेकीकडे किती पैसा आहे याची कल्पनाच नसल्याचं आता समोर आलं आहे. पश्चिम बंगालमधील एका जुन्या, मोडकळीस आलेल्या घरामध्ये त्या राहतात. हे घर उत्तर 24 परगनाच्या बेलघोरिया परिसरात आहे. येथे अर्पिताची आई मिनती मुखर्जी या एकट्याच राहतात. घर जवळपास 50 वर्षे जुनं आहे. या घरामध्ये अर्पिताच्या वृद्ध आणि आजारी असलेल्या आईकडे कोणतंच मौल्यवान सामान देखील नाही.

मुलगी सोयीसुविधा आणि श्रीमंतीचं आयुष्य जगत असताना दुसरीकडे आईजवळ आवश्यक गोष्टींची देखील कमतरता असलेली पाहायला मिळत आहे. अर्पिताने आजारी आईची काळजी घेण्यासाठी 2 हाऊस हेल्पर ठेवले आहे. ते त्यांच्या जेवणाची व्यवस्था करतात. परिसरातील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्पिता कधी कधी आपल्या आईला एका कारमधून भेटायला येते. पण ती येथे जास्त वेळ थांबत नाही. अर्पिताच्या आईने लेकीबाबत बोलण्यास नकार दिला आहे.