काँग्रेसचा 'नायक', तेलंगणात एकहाती सत्ता खेचून आणणारे रेवंत रेड्डी कोण आहेत? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 03:11 PM2023-12-03T15:11:49+5:302023-12-03T15:17:15+5:30

राहुल गांधींनी टाकला विश्वास, रेवंत रेड्डींनी पाडला BRS चा अभेद्य किल्ला; मुख्यमंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता.

Telangana Assembly Election Results 2023 : आज मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. या सर्व राज्यांमध्ये अजूनही मतमोजणी सुरू आहे, पण सुरुवातीच्या ट्रेंडनुसार तेलंगणात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. कर्नाटकानंतर तेलंगणा हे दक्षिणेतील दुसरे राज्य आहे, जिथे काँग्रेसची एकहाती सत्ता आली आहे. तेलंगणातील विजयानंतर सर्वात जास्त चर्चा मुख्यमंत्रीपदाची होत आहे.

काँग्रेसने आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार अद्याप घोषित केलेला नाही, पण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांचे नाव आघाडीवर आहे. याशिवाय, खासदार कॅप्टन एन उत्तमकुमार रेड्डी, कोमातीरेड्डी व्यंकट रेड्डी आणि मल्लू भट्टी विक्रमार्क यांसारख्या नेत्यांच्या नावांचीही चर्चा सुरू आहे. या सर्वांमध्ये रेवंत रेड्डी यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तेलंगणातील विजयाचे सर्वाधिक श्रेय रेवंत रेड्डी यांना मिळत आहे. त्यामुळेच मुख्यमंत्रीपदासाठी रेवंत रेड्डी यांची सर्वाधिक चर्चा आहे. रेवंत रेड्डी हे तेलंगणा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. 2019 मध्ये जिंकलेल्या तेलंगणातील काँग्रेसच्या तीन लोकसभा खासदारांपैकी ते एक आहेत. विशेष म्हणजे, या निवडणुकीत रेवंत रेड्डींनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याविरोधात गजवेल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे.

तेलंगणा विधानसभा निकालाच्या एक दिवस आधी रेवंत रेड्डी कार्यकर्त्यांमध्ये पोहोचले होते, तेव्हा त्यांच्या समर्थनार्थ 'सीएम-सीएम'च्या घोषणा देण्यात आल्या. तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान रेवंत रेड्डी काँग्रेसचा प्रमुख चेहरा राहिले. प्रचारादरम्यान ते नेहमीच राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासोबत दिसत होते. तेलंगणाची स्थापना 2013 मध्ये झाली. त्यानंतरची ही तिसरी निवडणूक आहे. या निवडणुकीत केसीआर मुख्यमंत्री म्हणून हॅट्ट्रिक करण्यात अपयशी ठरताना दिसत आहेत.

रेवंत रेड्डी यांचा जन्म 1969 मध्ये अविभाजित आंध्र प्रदेशातील महबूबनगर येथे झाला. रेड्डी यांनी विद्यार्थी राजकारणाची सुरुवात अभाविपपासून केली होती. नंतर त्यांनी चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षात प्रवेश केला. 2009 मध्ये ते टीडीपीच्या तिकिटावर आंध्रमधील कोडंगलमधून आमदार म्हणून निवडून आले. 2014 मध्ये ते तेलंगणा विधानसभेत टीडीपीचे सभागृह नेते म्हणून निवडले गेले.

यानंतर 2017 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, 2018 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. काँग्रेसने त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना मलकाजगिरीतून तिकीट दिले, ज्यामध्ये ते विजयी झाले. 2021 मध्ये काँग्रेसने त्यांना मोठी जबाबदारी दिली आणि प्रदेशाध्यक्ष केले.