विद्यार्थिनींवर पोलिसांनी केला लाठीचार्ज, बनारस हिंदू विद्यापीठातील आंदोलनाला हिंसक वळण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 11:46 AM2017-09-25T11:46:00+5:302017-09-25T11:51:40+5:30

बनारस हिंदू विद्यापीठात (बीएचयू) विद्यार्थिनीच्या छेडछाडीविरोधात विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला शनिवारी मध्यरात्री हिंसक वळण लागलं.

फाइन आर्ट्स अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षाला असलेल्या एका विद्यार्थिनीची बाइकवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी दोन दिवसांपूर्वी छेड काढली होती.

त्याबाबत तिनं सुरक्षारक्षकांकडे तक्रार केली असता, त्यांनी तिलाच उपदेशाचे डोस पाजले होते. अंधार झाल्यावर तू बाहेर काय करत होतीस, असं त्यांनी तिला विचारलं. हा सगळा प्रकार तिनं आपल्या मैत्रिणींना सांगितला होता, तेव्हा सगळ्यांनी मिळून धरणं आंदोलन करायचं ठरवलं होतं.

आयआयटी-बीएचयू आणि महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीही त्यांच्यासोबत रस्त्यावर उतरल्या होत्या. कुलगुरूंनी या घटनेची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. परंतू, तेवढ्याने विद्यार्थिनींचं समाधान झालं नाही.

त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पोस्टर जाळून निषेध नोंदवला. त्यानंतरही आंदोलन शांततामय मार्गाने सुरू होतं.

पण, कुलगरू जी सी त्रिपाठी यांच्या घराबाहेर निदर्शनं करणाऱ्या विद्यार्थिनींवर सुरक्षारक्षकांनी लाठीचार्ज केला आणि परिस्थिती चिघळली.