Makar Sankranti 2018 : मकरसंक्रांतीविषयी या ६ गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2018 06:31 PM2018-01-12T18:31:09+5:302018-01-12T18:38:10+5:30

हिंदु धर्माचा नविन वर्षातला पहिला सण म्हणजे मकरसंक्रांत. भारतात विविध भागात मोठ्या प्रमाणावर हा सण साजरा केला जातो. वैज्ञानिकदृष्ट्या सांगायचं तर यादिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. म्हणजेच या सणाच्या नावात सूर्याचं दुसऱ्या राशीत प्रवेश वर्णन केलं गेलंय.

1) असं म्हणतात की या दिवशी दिवस आणि रात्र १२-१२ तासांची असते. त्यादिवसानंतर दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. या महिन्यानंतर हिवाळा जवळ जवळ संपत येतो आणि उन्हाळ्याची सुरुवात होते. याचदिवसानंतर भारतासह काही आशियाई देशात वसंत ऋतु सुरु होतो.

2) या सणाला जास्त करुन मकरसंक्रांत या नावाने ओळखलं जातं मात्र भारतात वेगवेगळ्या प्रांतात या दिवसाला वेगवेगळी नावं आहेत. उत्तर भारतापासून ते दक्षिण भारतापर्यंत आणि पुर्वेपासून पश्चिमेपर्यंत सर्वच राज्यांत हा सण मोठ्या प्रमाणात साजरा होतो. पश्चिम भारतात आणि दक्षिणेकडे या दिवसाला पोंगल म्हणूनही ओळखले जाते. तर उत्तरेकडे लोहरी म्हणून ओळखले जाते. तसंच उत्तरायण, माघी आणि खिचडी अशा नावांनीही हा सण ओळखला जातो.

3) यादिवशी तिळ आणि गुळांनी बनवलेले लाडु खाल्ले जातात.कधी कधी त्यात शेंगदाणेही मिसळलेले असतात. भारतात घराघरात ते लाडु बनतात आणि एकमेकांना वाटले जातात. एकमेकांना लाडु देताना ‘तिळगुळ घ्या गोड गोड बोला’ असं म्हटलं जातं. कुटूंबातला आणि समाजातला एकोपा वाढावा आणि ते नातं जास्त घट्ट व्हावं हा व्यापक हेतू त्या सणामागे आहे.

4) या सण हिवाळ्यात येत असल्याने तिळ आणि गुळासारखे गरम पदार्थ शरीरात जाणं फार चांगलं असतं. सणाच्या निमित्ताने का होईना त्यातही आरोग्याची काळजी घेतली जाते. म्हणजेच तिळगुळ हे चांगलं आरोग्य आणि एकमेकांतला प्रेम वाढवण्याचं प्रतिक ठरतात.

5) यादिवशी पतंग उडवण्यामागेही काही कारणं कारण असतात. आपल्याकडे जास्त करून सकाळच्यावेळी पतंग उडवली जातात. त्यावेळी सूर्य तेजस्वी असतोच मात्र तापलेला रखरखीत नसतो. त्यादरम्यान आपलं शरीर बराच वेळ सूर्यासमोर असतं. ही सकाळची सूर्यकिरणं मानवी शरीराला, त्वचेला आणि डोळ्यांना फार लाभदायक असतात. तसंही हिवाळ्यात शरीर कोरडं आणि रखरखीत पडलेलं असतं.

6) मकरसंक्रांत आली म्हणजे उत्तर प्रदेश येथील कुंभ मेळ्याच्या सुरु होण्याचे संकेत मिळतात. तसंच भारतातल्या इतर भागातही यादिवशी नदीत स्नान स्वत:ला शुध्द आणि पवित्र केलं जातं. इतकंच नव्हे तर काहींचं असंही म्हणणं आहे की यादिवशी मृत्यु पावल्याने तो व्यक्ती पुनर्जन्म न होता सरळ स्वर्गात जातो.