Corona Vaccine : कोरोना लसीचे 2 डोस घेतल्यावर साईड इफेक्टने किती जणांचा मृत्यू झाला?; सरकारनं सांगितला आकडा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 04:46 PM2022-02-12T16:46:14+5:302022-02-12T17:13:28+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 50,407 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. रुग्णांच्या संख्येने 40 कोटींचा टप्पा केला असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

भारतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी देशामध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र आता सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. कोरोनाबाबत आता सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे.

गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 50,407 नवे रुग्ण आढळून आले आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात पाच लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

देश कोरोना संकटाचा सामना करत असून कोरोना लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. याच दरम्यान लसीच्या साईड इफेक्टची देखील चर्चा रंगली होती.

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर साईड इफेक्ट्समुळे झालेल्या मृतांचा आकडा आता समोर आला आहे. अँटी-कोविड-19 लसीचा (corona vaccines) दुसरा डोस घेतल्यानंतर विपरित परिणामांच्या घटनांमध्ये 167 लोकांचा मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी शुक्रवारी लोकसभेत ही माहिती दिली. एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली आहे. अशी सर्वाधिक 43 प्रकरणे केरळमध्ये झाल्याची माहिती भारती पवार यांनी सभागृहात दिली.

यानंतर महाराष्ट्रात 15, पश्चिम बंगालमध्ये 14 आणि मध्य प्रदेश आणि ओडिशामध्ये प्रत्येकी 12 मृत्यू झाले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंगच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे.

दुसर्‍या प्रश्नाच्या लेखी उत्तरात आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, गेल्या 3 फेब्रुवारीपर्यंत स्तनपान देणाऱ्या महिलांमध्ये लसीकरणानंतरच्या प्रतिकूल परिणामांची 13 प्रकरणे नोंदवली गेली आणि ती सौम्य लक्षणे होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. शनिवारी (12 फेब्रुवारी) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 50,407 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 804 जणांचा मृत्यू झाला.

कोरोनाच्या संकटात पाच राज्यांनी चिंता वाढवली असून तेथील परिस्थिती ही गंभीर आहे. यामध्ये केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि राजस्थानचा समावेश आहे. नव्या रुग्णांपैकी 60 टक्क्यांहून अधिक रुग्ण याच पाच राज्यांतील आहेत.

देशाचा रिकव्हरी रेट हा 97.37 टक्क्यांवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 6,10,443 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर लाखो लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.