नववर्षाची सुरुवात थंडी-पावसाने! महाराष्ट्र, गोव्यासह देशभरात कोसळण्याचा अंदाज; तसा प्लॅन करा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 11:41 AM2023-12-26T11:41:33+5:302023-12-26T11:46:02+5:30

New Year Rain in Maharashtra: नवीन वर्षाच्या स्वागताला अनेकजण हिलस्टेशनला गेले आहेत. परंतु, यापैकी अनेकांना पावसाची कल्पनाच नाहीय...

नवीन वर्षाच्या स्वागताला अनेकजण हिलस्टेशनला गेले आहेत. थंडी असल्याने या लोकांनी सोबत स्वेटर, उबदार कपडे नेले आहेत. परंतु, या लोकांना पावसाचाही सामना करावा लागणार याची कल्पनाच नाहीय. यामुळे त्यांच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आयएमडीने उत्तर-पश्चिम आणि मध्य भारताच्या काही भागात नवीन वर्षांच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ३१ डिसेंबरला पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. पश्चिमेकडील थंड वारे २९ किंवा ३० डिसेंबरला पश्चिमी हिमालयाकडे पोहोचणार आहेत. यामुळे हवामानात बदल होऊन पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

३० डिसेंबर ते १ जानेवारी या काळात तामिळनाडूच्या किनारी भागात मध्यम पावसाची शक्यता आहे. तर जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र आणि गोव्यात ३० डिसेंबर ते २ जानेवारी या काळात हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. पश्चिम राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेशचा काही भाग आणि दिल्ली आणि एनसीआरमध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. डोंगराळ भागात मुसळधार पाऊस अपेक्षित आहे.

तर 26 से 29 डिसेंबर काळात मध्य भारतात दाट ते अती दाट धुके कायम राहण्याची शक्यता आहे. पुढील ४ दिवस जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र आणि गोव्यासह आसपासच्या भागात दाट धुके राहील.

वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे तापमानात मोठी घसरण होणार असून, त्यामुळे नवीन वर्षाचे सेलिब्रेशन काहीसे थंडावणार आहे. पाऊस किंवा हिमवर्षाव नवीन वर्षाच्या उत्सवात व्यत्यय आणू शकतात. तसेच वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागू शकतो.

यंदा पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स ही चक्रीवादळे भूमध्य समुद्रावरून पूर्वेकडे सरकतात. यामुळे भारतीय उपखंडात पाऊस आणि बर्फवृष्टी होते. ही चक्रीवादळे भारतातील जलस्रोत भरण्यास आणि शेतीला जादाचे पाणी पुरविण्यासाठी उपयुक्त ठरतात. यामुळे या पावसाचा शेतीला फायदा होणार आहे. परंतु, फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसानही होणार आहे.