Maharashtra Politics: महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस यांच्यासमोर कोणते आव्हान? नवीन जबाबदारी सोपी नसणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 03:18 PM2023-02-12T15:18:08+5:302023-02-12T15:29:51+5:30

Maharashtra New Governor: भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्यानंतर रमेश बैस यांना महाराष्ट्राचे राज्यपाल करण्यात आले आहे.

Maharashtra New Governor Ramesh Bais: आपल्या विधानांमुळे नेहमी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले महाराष्ट्राचे मावळते भगतसिंह कोश्यारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरची कारकीर्द अखेर संपुष्टात आली. भगतसिंह कोश्यारी यांनी दिलेला राज्यपालपदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला. आता रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सध्या झारखंडचे राज्यपाल असलेले रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत. दरम्यान, आपल्या राजकीय निर्णयांमुळे आणि वक्तव्यांमुळे भगतसिंह कोश्यारी त्यांच्या कार्यकाळात अनेकदा वादात अडकले. विशेष म्हणजे, महाराष्ट्राचे भावी राज्यपाल रमेश बैस यांचा झारखंडमधील राज्यपालपदाचा कार्यकाळही वादात गेला आहे.

राज्यपालांनी हेमंत सोरेन सरकारकडे अर्धा डझनहून अधिक वेळा सरकारच्या दूरदृष्टी आणि निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले होते. हेमंत सोरेन आणि त्यांच्या पक्षाचे नेते अनेक प्रसंगी राज्यपालांना लक्ष्य करताना दिसले आहेत.

राज्यपाल रमेश बैस यांच्यासाठी महाराष्ट्राची नवी जबाबदारीदेखील सोपी असणार नाही. भगतसिंह कोश्यारी यांच्या काही जुन्या निर्णयांमुळे रमेश बैस यांना येणारा काळ सोपा नसणार, हे मात्र नक्की.

उद्धव ठाकरे सरकारच्या काळात राज्यपाल नियुक्त आमदारासाठी सरकारकडून 12 जणांची राजभवनाकडे पाठवण्यात आली होती. मात्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी यावर कोणताही निर्णय घेतला नाही.

दुसरीकडे, एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर एमव्हीए सरकारने दिलेली यादी रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्री कार्यालयाने राज्यपालांकडे केली. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाच्या पत्रावर राजभवनाने कोणताही निर्णय घेतला नाही. नवीन राज्यपाल रमेश बैस यांच्यासमोर राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबतचा निर्णय हा सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे,

2019 मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल बनले तेव्हापासूनच कोश्यारी वादात सापडले आहेत. 23 नोव्हेंबर रोजी पाहटे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी झाला. कोश्यारी यांनी अजित पवार यांच्यासोबत किती आमदार आहेत, हे न तपासता शपथविधी पार पाडला, असा आरोप करण्यात आला. राज्यपालांचा हा निर्णय पक्षपाती असल्याचे म्हटले होते. तेव्हापासून कोश्यारी यांचे उद्धव ठाकरेंच्या नव्या सरकारशी असलेले संबंधही बिकट खराब झाले. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरणही ताजे आहे.