खिशात २०० रुपये घेऊन मुंबई गाठली, खरकटी भांडी धुतली; कोट्यवधीचं साम्राज्य उभारलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 09:25 AM2023-08-08T09:25:29+5:302023-08-08T09:28:31+5:30

१० वी पूर्ण झाल्यानंतर शिक्षणात मन रमलं नाही. त्यामुळे घर सोडण्याचा निर्णय युवकानं घेतला. नोकरीच्या शोधात तो चेन्नईत आला. शहरात अनेक नोकऱ्या केल्या. परंतु काहीतरी नवीन करण्याचं आणि मोठं स्वप्न पाहण्याचं युवकानं सोडलं नाही.

चेन्नईमध्ये इतकी वर्ष नोकरी केल्यानंतर त्या शहराचा निरोप घेतला आणि नवीन स्वप्न घेऊन युवकाने मुंबई गाठली. इथं युवकाने त्याच्या स्वप्नाचा पहिला पाया रचला. या युवकाचं नाव आहे प्रेम गणपती. आज अनेकांना कदाचित त्यांचं शॉप माहिती असेल परंतु त्यांची यशस्वी कहाणी नाही.

प्रेम गणपती हे रेस्टॉरंट साखळी डोसा प्लाझाचे संस्थापक आहेत. देशातील नावाजलेल्या उद्योगांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. हातात केवळ २०० रुपये घेऊन त्यांनी चेन्नईहून मुंबई गाठली. कठोर मेहनत आणि मन लावून काम करून त्यांनी संघर्षातून नवंविश्व घडवलं.

प्रेम गणपती यांचा जन्म तामिळनाडूतील थुथुकडी जिल्ह्यातल्या नागालपुरम येथे झाला. २००२ मध्ये सेंटर वन मॉलमध्ये पहिले आऊटलेट सुरू केले. त्याचे नाव ठेवले “द डोसा प्लाझा” इथूनच त्यांच्या डोसा प्लाझाची सुरुवात झाली.

मॉलमध्ये वाढलेल्या बिझनेसमुळे प्रेम गणपती यांनी नवीन योजना, प्लॅनिंगनुसार पुढचं पाऊल उचलण्याची तयारी केली. कंपनीची फ्रेंचायसी देण्याची योजना आखली. देशभरात डोसा प्लाझा नेण्याचे स्वप्न पाहिले. प्रयत्न आणि इच्छाशक्तीच्या जोरावर प्रेम गणपती यांनी त्यांच्या व्यवसायाचा विस्तार केला.

काही वर्ष रेल्वे स्टेशनजवळ डोसा विकल्यानंतर भाड्याने एक दुकान घेतले. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी निरनिराळ्या प्रकाराचे डोसा बनवले. शेजवान, पनीर चिलीसह अनेक प्रकार आणले. आज त्यांच्याकडे २६ प्रकारचे डोसे मिळतात. त्यामुळे ते जास्त लोकप्रिय झाले.

सुरुवातीला मुंबईत आल्यानंतर माहिम बेकरीत १५० रुपये महिना भांडी धुण्याचं काम केले. या नोकरीचा त्यांनी आनंदाने स्वीकार केला. भांडी साफ करून काही पैसे वाचवले. त्या पैशातून पहिले दुकान उघडले. त्यात १५०० रुपये गुंतवणूक केली. त्यांनी बनवलेला डोसा ग्राहकांच्या पसंतीस आला.

अगदी कमी कालावधीत प्रेम गणपती यांच्या हाताची चव असलेला डोसा प्रसिद्ध झाला. त्यानंत दृढ निश्चय आणि जीवतोड मेहनत या बळावर प्रेम गणपती यांनी व्यवसाय उभारला. १९९० मध्ये प्रेम गणपती मुंबईत आले होते. त्यांच्यासोबत आलेल्या व्यक्तीने प्रेम गणपती यांना नोकरीला लावले.

हातात केवळ २०० रुपये घेऊन मुंबईत पोहचले. त्यात दुर्दैवाने वांद्रे स्टेशनला पोहचताच प्रेम गणपती यांचे सामान चोरीला गेले. परंतु त्यांची जिद्द आणि मोठे स्वप्न बघण्याची आशा हिरावली नाही. ध्येय डोळ्यासमोर ठेऊन प्रेम गणपती यांनी पुढील वाटचाल सुरू केली.

आजच्या घडीला डोसा प्लाझाचे देशभरात ७० हून अधिक आऊटलेट्स आहेत. विविध प्रकारच्या डोसामुळे परदेशी लोकंही डोसा प्लाझामध्ये त्यांची भूक भागवण्यासाठी येतात. भारतासह न्यूझीलँड, दुबई यासारख्या आंतरराष्ट्रीय शहरातही डोसा प्लाझा कार्यरत आहे.