आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 05:59 PM2024-05-22T17:59:34+5:302024-05-22T18:35:25+5:30

उन्हाळा अनेक आजार घेऊन येतो असं म्हणतात. यापैकी काही आरोग्यविषयक समस्या या सामान्य आहेत परंतु जर त्यावर वेळीच उपचार केले गेले नाहीत तर त्या गंभीर होऊ शकतात, ज्यामुळे तब्येत बिघडू शकते.

उन्हाळा अनेक आजार घेऊन येतो असं म्हणतात. यापैकी काही आरोग्यविषयक समस्या या सामान्य आहेत परंतु जर त्यावर वेळीच उपचार केले गेले नाहीत तर त्या गंभीर होऊ शकतात, ज्यामुळे तब्येत बिघडू शकते.

हीट स्ट्रोक ज्याला आपण उष्माघात देखील म्हणतो. पाण्याच्या कमतरतेमुळे उन्हाळ्यात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता असते. ही एक अतिशय सामान्य समस्या आहे परंतु जर यावर योग्य वेळी उपचार केले गेले नाहीत तर ते घातक देखील ठरू शकतं.

उष्णतेच्या लाटेमुळे ताप, अन्नातून विषबाधा, पोटदुखी, उलट्या अशा समस्या उद्भवू शकतात. हे टाळण्यासाठी आहाराची काळजी घ्यायला हवी. शरीरात पाण्याची कमतरता भासू नये. आपल्या आहारात हिरव्या भाज्या, सॅलड आणि फळांचा समावेश करा.

उन्हाळ्यात शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशन होतं. ही एक सामान्य समस्या असली तरी ती धोकादायक देखील असू शकते.

हे टाळण्याचा सोपा उपाय म्हणजे जास्तीत जास्त पाणी पिणं. पाण्याच्या कमतरतेवर मात करण्यासाठी काकडी, नारळ पाणी, लिंबू पाणी, फळांचा ज्यूस यासारख्या गोष्टींचा समावेश करा.

उन्हाळ्यात पोटाशी संबंधित समस्या अधिक त्रास देतात, उलट्या आणि जुलाब सारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. खराब झालेले अन्न खाल्ल्याने फूड पॉइजनिंग होऊ शकतं.

यामध्ये शरीरात हानिकारक बॅक्टेरिया तयार होतात जे पोट खराब करतात. योग्य आहार घेतल्यास ही समस्या टाळता येते. तसेच प्रकृतीची नीट काळजी घ्या.

उन्हाळ्यात एसिडिटीचा त्रास होतो. त्यामुळे छातीत जळजळ, वेदना, उलट्या अशा समस्या उद्भवू शकतात. वारंवार एसिडिटी होणं हे देखील गंभीर असू शकतं.

हे टाळण्यासाठी खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. तळलेले आणि मसालेदार पदार्थ खाणं शक्यतो टाळावे. जेवणाच्या वेळाही ठरवल्या पाहिजेत.

उन्हाळ्यात कावीळ होण्याचा धोकाही असतो. त्याला हेपेटायटीस ए असंही म्हणतात. दूषित पाणी आणि अन्नामुळे ही समस्या उद्भवू शकते. यावर वेळीच उपचार न केल्यास समस्या वाढू शकतात. पाणी उकळून आणि गाळून प्या.

उन्हाळ्यात डोळ्यांना इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. कडक सूर्यप्रकाश, उष्णतेमुळे डोळ्यांची जळजळ होते. यासाठी वेळोवेळी थंड पाण्याने डोळे स्वच्छ करत राहा. आरोग्यविषयक समस्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.