विद्यार्थिनीचा गळा चिरुन युवकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 06:00 AM2020-03-15T06:00:00+5:302020-03-15T06:00:31+5:30
अंकुश उर्फ गोलू भारत चव्हाण (२३) असे या आरोपी तरुणाचे नाव आहे. त्याने गावातील एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग सुरू केला होता. तो सतत तिची छेड काढून प्रेमाची गळ घालत होता. मुलीचा प्रतिसाद न मिळाल्याने शनिवारी सकाळी अंकुशने तिच्या गळ्यावर कटरने वार करून गळा चिरला. त्यानंतर आरोपीने केळझर शिवारातील एका शेतात स्वत:चे हात बांधून विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : गावात आजीकडे राहणाऱ्या विद्यार्थिनीचा एकतर्फी प्रेमातून गावातीलच युवकाने गळा चिरला. त्यानंतर त्याने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी आर्णी तालुक्यातील नाईकनगर हेटी येथे घडली.
अंकुश उर्फ गोलू भारत चव्हाण (२३) असे या आरोपी तरुणाचे नाव आहे. त्याने गावातील एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग सुरू केला होता. तो सतत तिची छेड काढून प्रेमाची गळ घालत होता. मुलीचा प्रतिसाद न मिळाल्याने शनिवारी सकाळी अंकुशने तिच्या गळ्यावर कटरने वार करून गळा चिरला. त्यानंतर आरोपीने केळझर शिवारातील एका शेतात स्वत:चे हात बांधून विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. विद्यार्थिनी घरात एकटी असताना संधी साधून अंकुशने तिच्यावर हल्ला केला व तो तेथून पळून गेला. त्या विद्यार्थिनीने जीव वाचविण्यासाठी आरडाओरडा केल्यानंतर शेजारी राहणारी काकू धावून आली. तेव्हा रक्ताच्या थारोळ्यात ती मुलगी पडून होती. तिला तातडीने उचलून गावातील नीलेश राठोड, विजय जाधव या तरुणांनी उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविले. प्रकृती गंभीर असल्याने तिला थेट यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मुलीची प्रकृती गंभीर आहे. तिच्यावर तातडीने काही शस्त्रक्रियाही करण्यात आल्या. मात्र प्रकृती धोक्यात असल्याचे वैद्यकीय सूत्राकडून सांगण्यात आले.
या प्रकरणी मुलीच्या काकाने दिलेल्या तक्रारीवरून आर्णी पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये आरोपी अंकुश चव्हाण याच्यावर गुन्हे दाखल केले. दरम्यान पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह केळझर शिवारातील शेतातील विहिरीत तरंगताना दिसला. यावरून त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले.
मुलीचे आई-वडील होते पुण्यात
मुलीचे आई-वडील पुणे येथे पेंटींगचे काम करीत होते. मागील काही महिन्यांपासून शिक्षणाच्या दृष्टीने ही मुलगी आजीसोबत गावात राहत होती.