नेरमध्ये टरबुजाच्या पिकावर संक्रांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 05:00 AM2020-03-31T05:00:00+5:302020-03-31T05:00:26+5:30
तालुक्यात अनेक प्रयोगशील युवा शेतकऱ्यांनी आपल्या शेतात टरबुजाचे उत्पादन घेणे सुरू केले आहे. आता टरबूज निघणे सुरू झाले आहे. मात्र बाजारात विकण्यासाठी नेण्याचा प्रश्न आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाल्याने पोलिसांकडून अडविले जात आहे. तालुक्याच्या ठिकाणी माल न्यायचा झाल्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. नियम तोडला म्हणून पोलिसांकडून कुठे आणि केव्हा मार बसेल याचा नेम राहिलेला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : टरबुजाचे उत्पादन घेऊन आर्थिकदृष्ट्या समृद्ध होण्याच्या प्रयत्नात असलेले तालुक्यातील उत्पादक चिंतेत सापडले आहे. लॉकडाऊनमुळे बाजारात टरबूज विकण्यासाठी जाऊ देत नाही, तर दुसरीकडे पावसामुळे सडण्याची भीती आहे. या उत्पादनावर आलेली संक्रांत दूर व्हावी यासाठी प्रशासनाकडूनच सहकार्याची साथ अपेक्षित असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
तालुक्यात अनेक प्रयोगशील युवा शेतकऱ्यांनी आपल्या शेतात टरबुजाचे उत्पादन घेणे सुरू केले आहे. आता टरबूज निघणे सुरू झाले आहे. मात्र बाजारात विकण्यासाठी नेण्याचा प्रश्न आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाल्याने पोलिसांकडून अडविले जात आहे. तालुक्याच्या ठिकाणी माल न्यायचा झाल्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. नियम तोडला म्हणून पोलिसांकडून कुठे आणि केव्हा मार बसेल याचा नेम राहिलेला नाही.
शेतकऱ्यांचा माल विक्रीसाठी अटकाव केला जाऊ नये, असे सरकारकडून सांगितले जाते. मात्र याठिकाणी या विपरित परिस्थिती आहे. बाजारात उभे राहिल्यानंतर खरेदीदार येतात. परंतु शहरात जायचे कसे, हा प्रश्न आहे. शेतात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठीचे टरबूज तयार झाले आहे. अशातच पावसाची हजेरी लागत आहे. या अस्मानी संकटामुळेही टरबूज उत्पादक हवालदिल झाला आहे.
तालुक्यात जवळपास ४० हून अधिक शेतकºयांनी टरबुजाची शेती केली आहे. उत्पादन अधिक, बाजारात माल न्यायची सोय नाही या व इतर कारणांमुळे किंमतही अतिशय कमी मिळत आहे. यामुळे हजारो टन टरबूज सडण्याची स्थिती आहे. अनेक शेतकऱ्यांनी कर्जाऊ रकमा काढून टरबुजाचे उत्पादन घेतले आहे. या पिकाचा पैसा होत नसल्याने कर्जाची परतफेड करायची कशी, याची चिंता सतावत आहे.
भरून न निघणारे नुकसान
यावर्षी टरबूज पिकाचे कधीही न भरून निघणारे नुकसान होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील तेजेस सिंगवी, संग्राम देशमुख, ओम दिनेश ढवक आदी युवा शेतकऱ्यांनी टरबुजाचे उत्पादन घेतले आहे. संचारबंदीमुळे त्यांना आपला माल परत आणावा लागला. याशिवाय इतरही शेतकऱ्यांना अशाच परिस्थितीला सामोरे जावे लागले.