शिक्षकांवर आता आली 'ही' नवीन जबाबदारी ! वाड्या-वस्त्या फिरा..
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 19:50 IST2026-03-27T19:49:28+5:302026-03-27T19:50:48+5:30
Yavatmal : जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी आणि पालकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने शिक्षण विभागाने 'गुढी पाडवा- प्रवेश वाढवा' हा उपक्रम हाती घेतला आहे.

Teachers now have this new responsibility! Go around the villages..
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी आणि पालकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने शिक्षण विभागाने 'गुढी पाडवा- प्रवेश वाढवा' हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार शिक्षकांना आता उन्हाच्या झळा सोसत वाड्या-वस्त्या पिंजून काढाव्या लागणार आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीत गुरुर्जीना नवीन जबाबदारी सांभाळताना मोठी कसरत करावी लागणार आहे.
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. आपल्या पाल्याला दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी पालक मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश देत आहेत. पालकांच्या मानसिकतेचा फायदा घेत शहरीसह ग्रामीण भागातही खासगी शाळांचे पेव फुटले आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १,२७९ प्राथमिक शाळा आहेत. विद्यार्थ्यांची पटसंख्या झपाट्याने कमी होत असल्याने ती वाढविण्यासाठी विविध उपक्रम वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यावर भर आहे. शिक्षक वाड्या-वस्त्यांमध्ये जाऊन थेट पालकांशी संवाद साधतील. यातून विविध योजनांची माहिती देण्यात येईल. विद्यार्थ्यांची यादी तयार करून प्रवेशासाठी प्रोत्साहित करावे लागणार आहे.
मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, बूटही मिळणार
विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्याची मागणी समग्र शिक्षण अभियानाकडून नोंदविण्यात आली आहे. तसेच गणवेश व बूटही शाळेच्या पहिल्या दिवशी देण्याचे नियोजन आहे.
मुलांच्या गळ्यात हार, बैलगाडीतून मिरवणार
विद्यार्थी शालेय सत्राच्या पहिल्या दिवशी शाळेत यावेत, त्यांना शाळेची ओढ लागावी, यासाठी जल्लोषात स्वागत करण्यात येते. पहिल्या दिवशी मुलांच्या गळ्यात हार टाकून स्वागत करण्यात येणार आहे. तसेच बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात येणार आहे. यातून उत्सवी वातावरण निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
गुणवत्ता सुधारतेय
शिष्यवृत्ती परीक्षेसह नवोदय परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांचा टक्का वाढला आहे. जिल्हा परिषद शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता सुधारत असल्याचे चित्र आहे.
विद्यार्थ्यांसाठी आहेत विविध योजना
विद्यार्थ्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी मध्यान्ह भोजन योजना राबविली जाते. कोणत्याही मुलाचे शिक्षण आर्थिक परिस्थितीअभावी थांबू नये, यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यावर शिक्षण विभागाचा भर आहे.
यंदा तरी विद्यार्थ्यांचा टक्का वाढणार का?
शिक्षण विभागाने गुढी पाडवा-प्रवेश वाढवा, हा उपक्रम हाती घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न शिक्षकांना करावा लागणार आहे. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण किती दर्जेदार आहे, हे पालकांशी संवाद साधून पटवून देण्यात येणार आहे. शिवाय पालकांच्या अडचणीही समजून घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचा टक्का किती वाढणार, हे प्रवेश घेतल्यानंतरच कळणार आहे.