सीईओंच्या आदेशाने शाळेत तांदळाचे वाटप सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 05:00 AM2020-03-31T05:00:00+5:302020-03-31T05:00:24+5:30
कोरोना रोखण्यासाठी शाळेत होणारी गर्दी टाळण्याच्या उद्देशाने सर्वच शाळांना ३१ मार्चपर्यंत सुट्या जाहीर करण्यात आल्या. आता तर १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित झाल्याने या सत्रातील शाळा भरण्याची शक्यताच नाही. दरम्यानच्या कालावधीत शालेय पोषण आहारासाठी प्रत्येक शाळेत एक ते दोन महिन्यांचा तांदळाचा साठा शिल्लक आहे. तर दुसरीकडे संचारबंदीमुळे बहुतांश पालकांचा रोजगारही थांबला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोनामुळे अचानक शाळांना सुट्या मिळाल्या. त्यामुळे तब्बल दोन महिन्यांचा पोषण आहाराचा तांदूळ पडून आहे. आता या तांदळाचे विद्यार्थ्यांना वाटप करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सोमवारी दिले. विशेष म्हणजे आदेश निघताच काही शाळांनी सोमवारीच वाटपही सुरू केले.
कोरोना रोखण्यासाठी शाळेत होणारी गर्दी टाळण्याच्या उद्देशाने सर्वच शाळांना ३१ मार्चपर्यंत सुट्या जाहीर करण्यात आल्या. आता तर १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित झाल्याने या सत्रातील शाळा भरण्याची शक्यताच नाही. दरम्यानच्या कालावधीत शालेय पोषण आहारासाठी प्रत्येक शाळेत एक ते दोन महिन्यांचा तांदळाचा साठा शिल्लक आहे. तर दुसरीकडे संचारबंदीमुळे बहुतांश पालकांचा रोजगारही थांबला आहे. त्यामुळे अनेक कुटुंबीयांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर आहे.
ही स्थिती लक्षात घेता शालेय पोषण आहाराच्या धान्याची विद्यार्थ्यांना समप्रमाणात वाटप करण्याचे राज्य स्तरावरून निर्देश प्राप्त झाले. त्यानुसार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सोमवारी सर्व गटशिक्षणाधिकाºयांना आदेश दिले. आदेश निघताच लोहारा येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेत पालकांना बोलावून धान्य वाटप करण्यात आले. धान्य वाटप करताना संचारबंदीचे, सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना आहे. त्यानुसार लोहारा शाळेतही आवारात ठराविक अंतरावर वर्तुळ रेखाटून त्या वर्तुळातच पालकांना उभे ठेवून धान्य वाटप करण्यात आले.
शिक्षक बदल्यांच्याही हालचाली
जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली धोरणात सुधारणा करण्यासाठी पुणे सीईओच्या नेतृत्वातील अभ्यास गटाचा अहवाल शासनाला सादर झाला आहे. त्यानुसार बदली प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी पुण्याच्या एनआयसी सेंटरमधील संगणकीय प्रणालीत बदल करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने दिले. त्यामुळे संचारबंदीत घरी बसलेल्या शिक्षकांमध्ये पुन्हा एकदा बदल्यांची चर्चा सुरू झाली आहे.