लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : १४० या क्रमांकापासून सुरू होणाऱ्या फोन कॉलबाबत सोशल मीडियातून वेगवेगळ्या अफवा पसरविल्या जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. परंतु यवतमाळ जिल्हा पोलिसांच्या सायबर गुन्हे नियंत्रण विभागाने १४० क्रमांकावरील फोन कॉल बिनधास्त उचला, असा सल्ला दिला आहे.१४० क्रमांकावरून आलेल्या कॉलपासून कोणतीही भीती अथवा धोका नाही. १४० हा क्रमांक टेलिमार्केटिंगकरिता दिलेला आहे. तो रिसिव्ह केल्याने काहीही होणार नाही, फक्त कुणालाही आपले बँक डिटेल्स, वैयक्तिक माहिती, ओटीपीसह डेबिट कार्ड, क्रेडीट कार्डची माहिती, पीन नंबर देऊ नये. ही दक्षता घेणे गरजेचे आहे. ही सर्व माहिती कळत न कळत दिल्यानंतरच बँक खात्याचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे योग्य दक्षता घ्यावी असेही आवाहन सायबर सेलच्यावतीने करण्यात आले आहे. १४० क्रमांकावरून फोन आला व तुम्ही तो कॉल रिसिव्ह केला तर मोठा धोका आहे. मोबाईल हॅक होऊन इतरही आर्थिक नुकसान होत असल्याची बतावणी या मेसेजमधून करण्यात आली आहे. प्रत्यक्ष ती अफवा आहे.१४० क्रमांकाने सुरू होणाऱ्या नंबरवरुन कॉल आल्यास घाबरु नका, तो जाहिरातीसाठी केलेला कॉल आहे. कुठल्याही कॉलवर वैयक्तिक माहिती शेअर करू नये. प्रत्येकाने दक्ष रहावे. प्रलोभनापासून दूर रहा.- अमोल पुरीसहायक पोलीस निरीक्षक, सायबर सेल.