पुसद एमआयडीसीतील उद्योगांवर अवकळा
By Admin | Updated: October 12, 2014 23:37 IST2014-10-12T23:37:45+5:302014-10-12T23:37:45+5:30
बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पुसद एमआयडीसीतील उद्योगांवर भारनियमन आणि अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे अवकळा आली आहे. ३० उद्योग तर अखेरच्या

पुसद एमआयडीसीतील उद्योगांवर अवकळा
पुसद : बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पुसद एमआयडीसीतील उद्योगांवर भारनियमन आणि अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे अवकळा आली आहे. ३० उद्योग तर अखेरच्या घटका मोजत असून प्रशासकीय यंत्रणेच्या निष्क्रीयतेने औद्योगिक विकासाचे स्वप्न भंगले आहे.
माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या प्रयत्नाने १९९२-९३ मध्ये पुसद येथे औद्योगिक वसाहत मंजूर झाली. दिग्रस मार्गावरील धुंदी घाटोळी परिसरात १६९ हेक्टर भूखंड घेण्यात आला. मुख्य रस्त्यालगत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ असा मोठा फलक लावला आहे. फलकापासून दूरवर दिसणारी ओसाड जमीन आणि औद्योगिक वसाहत आपली व्यथा सांगताना दिसत आहे. उद्योगाच्या घरी रिद्धीसिद्धी पाणी भरी, असे म्हणतात, परंतु औद्योगिक वसाहतीत कोणी चिटपाखरुही फिरकताना दिसत नाही. या संपूर्ण परिसरात पसरलेली उदासीनता क्षणाक्षणाला जाणवते.
सरकारी नोकरीचा ध्यास लावून बसलेल्या तरुणांना शासनाने उद्योजक होण्याचे आवाहन केले. परंतु येथील एमआयडीसी उद्योगासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत गरजांची पूर्तताच केली नाही. त्यामुळे एमआयडीसीतील ९० टक्के भूखंड रिकामे आहे. सुरुवातीचे सहा वर्षतर या परिसरात एकही उद्योग आला नाही. १६ वर्षापूर्वी मोठा उद्योग नाही परंतु एका उद्योजकाने निंबाळी खताचा उद्योग उभारला. त्यानंतर हळूहळू ३० उद्योग या ठिकाणी सुरू झाले. त्यात तीन आईस फॅक्टरी, दोन बायोकोल, दोन मिनरल वॉटर पॅकिंग प्लाँट, कागद कारखाना, जिनिंग निंबाळी खत, सिमेंट वॉटर टँक, वीज खांब निर्मिती उद्योग, दूध डेअरी आदींचा समावेश आहे. सुरुवातीला भरभराटीस आलेल्या या उद्योगांना अलिकडे भारनियमनाचा मोठा फटका सहन करावा लागतो. कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने मशनरी नष्ट होण्याची भीती असते. तसेच उद्योगासाठी लागणारा पाणीपुरवठाही अनियमित आहे. त्यामुळे पाण्याचा साठा करावा लागतो. परंतु तेही शक्य होत नाही.
माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या आग्रहास्तव पुसदच्या एमआयडीसीला स्पेशल दर्जा देण्यात आला. परंतु सुविधा मात्र मिळाल्या नाही. या एमआयडीसीत विजेसाठी अतिरिक्त फिडरची गरज आहे. परंतु ही व्यवस्था येथे नसल्याने वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. वीज समस्येबाबत येथील उद्योजकांनी वारंवार वरिष्ठांना कळविले. परंतु कुणीही लक्ष दिले नाही. त्यामुळे आता तर अनेकांनी येथील उद्योग गुंडाळण्याची तयारी चालविली आहे. यामुळे येथील उद्योगाला अखेरची घरघर लागली असून एमआयडीसी ओस पडत आहे. (तालुका प्रतिनिधी)