मुलाचा भोसकून खून, वडिलांच्या खुनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 05:00 AM2020-04-01T05:00:00+5:302020-04-01T05:00:15+5:30
सोमवारी क्षुल्लक कारणावरुन वाद झाला. यात गणेश आणि शुभम हे दोघेही सूर्यकांत आणि साहेबराव यांना शिवीगाळ करीत होते. हा वाद अत्यंत विकोपाला गेला. यात गणेश आणि शुभम या दोघांनी मिळून चाकूहल्ला केला. सूर्यकांत वारसवाड यांना बराच मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. सूर्यकांतचा जागीच मृत्यू झाला. त्याचे वडील साहेबराव वारसवाड या जीवघेण्या हल्ल्यातून बचावले. मात्र तेही गंभीर जखमी झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : किरकोळ वादातून एका तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. तालुक्यातील सुकळी येथे सोमवारी रात्री ही घटना घडली. सूर्यकांत साहेबराव वारसवाड असे मृताचे नाव असून या हल्ल्यात सूर्यकांतचे वडील साहेबराव हे देखील गंभीर जखमी झाले आहे.
या प्रकरणात आर्णी पोलिसांनी गणेश रामभाऊ मोरे (२६) आणि शुभम रामभाऊ मोरे (१९) या दोघांना ताब्यात घेतले आहे. वारसवाड आणि मोरे हे दोन्ही कुटुंब सुकळी येथे शेजारी राहतात. त्यांच्यात सोमवारी क्षुल्लक कारणावरुन वाद झाला. यात गणेश आणि शुभम हे दोघेही सूर्यकांत आणि साहेबराव यांना शिवीगाळ करीत होते. हा वाद अत्यंत विकोपाला गेला. यात गणेश आणि शुभम या दोघांनी मिळून चाकूहल्ला केला. सूर्यकांत वारसवाड यांना बराच मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. सूर्यकांतचा जागीच मृत्यू झाला. त्याचे वडील साहेबराव वारसवाड या जीवघेण्या हल्ल्यातून बचावले. मात्र तेही गंभीर जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी गावकऱ्यांनी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविले. सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे समजते.
दरम्यान मृतक सूर्यकांत वारसवाड याची बहीण विद्या अर्जून घेरवाल (२५) हिने सोमवारी रात्रीच आर्णी पोलिसात घटनेबाबत तक्रार दाखल केली.
त्यावरून पोलिसांनी लगेच सुकळी गाठून दोन्ही आरोपी भावंडांना ताब्यात घेतले. तसेच हल्ल्यात वापरलेला चाकूसुद्धा जप्त केला. विद्याच्या फिर्यादीवरून भादंवि ३०२, ३०७, २९४, ५०४, ३४ कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद उलेमाले, हेडकॉन्स्टेबल अरुण पवार, संजय भारती, गजानन खांदवे, संदीप गोहणे, महेश बाडेलवार तपास करीत आहे.
लॉकडाऊनमुळे गाव भांडणापासून अनभिज्ञ
कोरोना प्रतिबंधासाठी सर्वत्र लॉकडाऊन आहे. खुनाची घटना घडली त्यावेळी सुकळी गावातही सर्वत्र सामसूम होती. त्यामुळेच एवढा मोठा जीवघेणा हल्ला झाल्यावरही गावकऱ्यांना घटनेची माहिती उशिरा कळली. गावात नेहमीप्रमाणे वर्दळ असती तर कदाचित हे भांडण विकोपाला जाण्यापूर्वीच कुणी तरी मध्यस्थी करून सोडविले असते, अशी चर्चा गावकऱ्यांमध्ये आहे. दरम्यान आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस गावात पोहोचल्यावरही आरोपी अरेरावी करीत होते, असे गावकऱ्यांनी सांगितले.